वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी भारतीय मुष्टीयुद्ध संघ दुबईत दाखल झाला आहे. या संघाच्या विमान प्रवासाला विलंब झाला होता. पण, भारतीय संघातील एमसी मेरी कॉम आणि अमीत पांगल हे दुबईत दाखल झाले आहेत.
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचा ड्रॉ रविवारी काढण्यात येणार आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी मुष्टियोद्धय़ांसाठी ही शेवटची प्रमुख स्पर्धा आहे. भारतीय मुष्टियुद्ध संघाचे शुक्रवारी सायंकाळी दुबईत आगमन झाले. या स्पर्धेत भारताचा 10 जणांचा संघ भाग घेत आहेत. महिला विभागात एमसी मेरी कॉम, सिमरनजीत कौर, बी. लोवलिना, पुजा राणी, पुरूष विभागात अमित पांगल, मनिष कौशिक, सतीशकुमार यांचा समावेश आहे. या आगामी स्पर्धेत भारत, इंडोनेशिया, इराण, कझाकस्तान, दक्षिण कोरिया, किर्गीस्तान, फिलीपाईन्स आणि उझ्बेक यांच्यासह अन्य काही देशांचे स्पर्धक सहभागी होत आहेत. थायलंडमध्ये 2019 साली झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, 4 रौप्य आणि पाच कास्यपदकांची कमाई केली होती.