वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
21 मे पासून दुबई आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने 20 सदस्यांचा संघ पाठविण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान भारतीय मुष्टीयुद्ध संघाला अद्याप व्हिसा मिळाला नसल्याने या स्पर्धेत भारताचा सहभाग अनिश्चित असल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये 10 महिलांचा समावेश आहे.
सदर स्पर्धेसाठी दुबईला प्रवास करण्याकरिता व्हिसाची जरूरी असते. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धा यापूर्वी दिल्लीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण देशातील कोरोना महामारी समस्येमुळे आशियाई मुष्टीयुद्ध कॉन्फेडरेशनने ही स्पर्धा दुबईमध्ये घेण्याचे ठरविले. या स्पर्धेसाठी भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध संघासाठी पतियाळाच्या साई केंद्रामध्ये सराव शिबीर तर महिला संघासाठी पुण्यातील सेनादलाच्या क्रीडाकेंद्रामध्ये सराव शिबीर आयोजित केले होते. आतापर्यंत भारताचे नऊ मुष्टीयोद्धे टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले असून त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.