अँटिग्वा
6 प्रतिस्पर्धी आणि कोरोनाच्या महासंकटावर मात करत भारतीय युवा क्रिकेट संघाने आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात विक्रमी पाचवे जेतेपद प्राप्त केले. राज बावाचे (31 धावात 5 बळी आणि 54 चेंडूत 35 धावा) अष्टपैलू योगदान, शेख रशीद, निशांतची (50) तडफदार अर्धशतके आणि रवी कुमारच्या 4 बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडला धूळ चारत जेतेपदावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया इंग्लंडला 44.5 षटकात सर्वबाद 189 गुंडाळल्यानंतर भारताने 4 गडी व 14 चेंडूंचा खेळ बाकी राखत विजय मिळवला. आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताचे हे पाचवे अजिंक्यपद ठरले.
विजयासाठी 190 धावांचे आव्हान असताना भारतातर्फे शेख रशीद (50), निशांत सिंधू (54 चेंडूत नाबाद 50), राज बावा (35) यांची फटकेबाजी महत्त्वाची ठरली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया इंग्लंडचा डाव 44.5 षटकात सर्वबाद 189 धावांवरच आटोपला. राज बावाने 31 धावात 5 बळी घेत इंग्लंडच्या मध्यफळीला खिंडार पाडले तर बहरातील रवी कुमारने त्यापूर्वी 34 धावात 4 बळी घेत आघाडी फळी कापून काढली होती.
भारताने इंग्लंडचे गडी ठरावीक अंतराने बाद करण्याचा सिलसिला कायम राखला आणि याचमुळे इंग्लिश संघाला अगदी 50 षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. एकवेळ तर इंग्लंडची 7 बाद 91 अशी धुळधाण उडाली होती. केवळ ऱयू व जेम्स सॅलेस यांच्या भागीदारीमुळेच इंग्लंडला 93 धावांची भागीदारी फलकावर लावता आली. यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या लढतीत दुसऱया षटकातच इंग्लंडला पहिला धक्का देण्यात यश मिळवले. रवी कुमारने धोकादायक जेकब बेथेलला स्वस्तात बाद केले आणि इथून इंग्लंडच्या पडझडीला सुरुवात झाली होती.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ः 44.5 षटकात सर्वबाद 189 (जेम्स ऱयू 116 चेंडूत 12 चौकारांसह 95, सॅलेस 65 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 34, थॉमस 30 चेंडूत 27. रवी कुमार 9-1-34-4, राज बावा 9.5-1-31-5, कौशल तांबे 5-0-29-1).
भारत ः 47.4 षटकात 6 बाद 195. (निशांत सिंधू 54 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 50, शेख रशीद 50, दिनेश बाणा 5 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 13).