नवी दिल्ली /प्रतिनिधी
कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने जनतेला प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी, स्थलांतरित मजुरांना ये-जा करण्यासाठी आणि विविध स्थानांसाठी असलेल्या प्रतीक्षा यादीचा निपटारा करण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशात कोरोनाच सावट असूनही भारतीय रेल्वेने जूनमध्ये आणखी ६६० गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. जेणेकरून प्रवासी कामगारांना प्रवास करण्यास सुलभ होईल.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर देशात कठोर निर्बंध लागू केले. त्यानंतर उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कामगार आपापल्या राज्यात परतले होते. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत असल्याने पुन्हा काही प्रमाणात उद्योग, व्यवसाय सुरु झाले आहेत. देशात सध्या परिस्थिती सुधारत असून उद्योग धंदे सुरू होत आहेत, म्हणून घरी परत गेलेले कामगार आता परत येत आहेत. यामुळे प्रवासी गाड्यांची मागणी वाढली असून, त्या दृष्टीने रेल्वेने ६६० गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्यांचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोरोना कालावधीपूर्वी दररोज सरासरी १७६८ मेल/एक्स्प्रेस गाड्या चालविल्या गेल्या. १८ जून रोजी, ९८३ मेल/एक्सप्रेस गाड्या चालविल्या गेल्या आहेत.