उत्तराखंडमध्ये पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी उत्तराखंडच्या उधमपूर येथे जनसंकल्प सभेला संबोधित केले आहे. राज्यातील मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी मोदींची ही येथील अखेरची प्रचारसभा होती. या सभेत बोलताना मोदींनी स्वदेशी कोरोना लसीला बदनाम करण्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे. काँग्रेस पक्ष खोटय़ा आश्वासनांचा भांडार असल्याचे त्यांनी म्हटले.
लसीचे कवच मिळाल्यावर रोजगार आणि उद्योगधंदे पुन्हा सुरू व्हावेत असे अफवा पसरविणाऱयांना वाटत नव्हते. सर्वकाही रुळावर आल्यावर लोक मोदीला शिव्या कशा देणार हा विचार ते करत होते. परंतु या लोकांना उत्तराखंडच्या सामर्थ्याचा विसर पडतो. आम्ही कोरोना महामारीदरम्यान देशातील कुठल्याच नागरिकाला उपाशी झोपू दिले नसल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
निवडणुकीत मोठमोठी आश्वासने द्या, सरकार स्थापन करा, मग आश्वासने पूर्ण न करता घोटाळे-भ्रष्टचार करा असे काँग्रेसचे अनेक दशकांपासूनचे धोरण राहिले आहे. यावेळी देखील काँग्रेसने दिलेली सर्व आश्वासने खोटी आहेत. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी या निवडणुकीत उत्तराखंडमधील ही प्रचारसभा जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उधमसिंह नगरमध्ये एकप्रकारे मिनी इंडियाची झलक दिसून येते. देशाच्या सर्व भागांमधील लोक येथे राहतात. उधमसिंह नगर हे एक भारत-श्रेष्ठ भारताचे जिवंत दृश्य आहे. गंगामातेचा आणि देवभूमीचा अपमान करणाऱयांना उत्तराखंडचे लोक माफ करणार नाही. उत्तराखंडचे सुपुत्र जनरल बिपिन रावत यांना काँग्रेसकडून रस्त्यावरील गुंड असे हिणविण्यात आले होते. देशासाठी सैन्याचा गणवेश परिधान करणाऱयाचा काँग्रेसकडून अपमान करण्यात आला. अशा लोकांना उत्तराखंडची जनता धडा शिकविणार असल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस राज्यासाठी धोकादायक
काँग्रेस पक्ष हा उत्तराखंडसाठी धोकादायक आहे. वीर साहिबजाद्यांचे बलिदान देशच्या मुलांना येणाऱया अनेक पिढय़ांपर्यंत प्रेरणा देण्याची शक्ती राखून आहे. परंतु काँग्रेसला वीर साहिबजाद्याचे बलिदान कधीच दिसले नाही. भाजपच्या सरकारने 26 डिसेंबरला वीर बाल दिन घोषित केले आहे. उत्तराखंडची ओळख मिटविण्याचा कट रचणारे लोक उत्तराखंडच्या संस्कृतीसाठी सर्वात मोठा धोका आहेत असे मोदींनी म्हटले आहे.
राष्ट्रसंबंधी वक्तव्यावर निशाणा
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणांचा अप्रत्यक्ष स्वरुपात उल्लेख केला. काँग्रेसचे लोक भारत हे राष्ट्रच नसल्याचे सांगतात. जे लोक भारताला राष्ट्र मानत नाहीत, राष्ट्राच्या भावनेचा अपमान करत असतील, देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱया वीरांचा अपमान करत असतील, असे लोक उत्तराखंडला उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने येथे आले आहेत. उत्तराखंडकडे काँग्रेसचे उच्चाटन करण्याची संधी असल्याचे मोदी म्हणाले.