महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी भारतभर 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन निसर्ग आणि पर्यावरणविषयक जागृती करण्याच्या हेतूने दरवर्षी करण्यात येते. भारताच्या प्राचीन धर्म आणि संस्कृतीने निसर्ग आणि पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणाला इथल्या भूमीपुत्रांनी प्राधान्य द्यावे म्हणून विविध सण उत्सवांच्या विधी, परंपरांत या संदर्भातल्या मुल्यांची सांगड घातलेली असली तरी आज आपल्या देशात पर्यावरण, जंगल आणि वन्यजीवांचा जो ऱहास होत चालला आहे ही चिंतेची बाब निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप आरंभल्याकारणाने कोरोना आणि त्यापूर्वी आलेल्या रोगांनी अद्दल घडविलेली आहे. पुढच्या व्यक्तीला ठेच लागल्यानंतर मागच्या व्यक्तीने शहाणपणाने वागणे अपेक्षित असताना देखील निसर्गाचे संतूलन टिकेल या दृष्टीने अपवादात्मक प्रयत्न केले जातात. त्यामुळे नैसर्गिक जंगलांचे शतकोत्तर परंपरा लाभलेले आच्छादन एका बाजुला नष्ट होत असताना, दुसऱया बाजुला कृत्रिमरित्या मानवी समाजाने हाती घेतलेल्या हरित पट्टय़ात भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार वाढ होत असतानाच पर्यावरणीय संकटे विस्तारत आहेत.
एका बाजुला हिमनगाच्या वितळण्याच्या प्रक्रियेत जी वाढ झालेली आहे, त्यामुळे आलेल्या महापुरात जीवित आणि वित्तिय हानीचे प्रमाण वाढत चाललेले आहे तर दुसऱया बाजुला पेयजल आणि जलसिंचनाच्या पुरवठय़ात उद्भवणाऱया विस्कळीतपणामुळे कष्टकऱयांसमोर आत्महत्या करण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत आहे. देशभरातली ही टोकाची परिस्थिती निसर्गातल्या लहरीपणासमोर हतबल ठरलेल्या समाज आणि सरकारी यंत्रणेतला फोलपणा सिद्ध करत आहे. आज आशियाई हत्तीचा नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस महामार्ग, रेल्वेमार्ग, बहुउद्देशीय धरण प्रकल्प आणि तत्सम विकास नाव धारण करून आलेल्या प्रकल्पांमुळे संकटग्रस्त होऊन त्यांच्याच जीवावर बेतलेले आहे. गुजरात राज्यातील गीर येथील राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहाच्या प्रजातीचे शेवटचे निवासस्थान ठरलेले असताना, खाण व्यवसाय आणि अन्य प्रकारच्या असंख्य संकटांमुळे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात आहे. जागतिक स्तरावरच्या वन्यजीवांतल्या व्याघ्रसंख्येच्या 70 टक्के वाघ, 70 टक्के आशियाई सिंह, 60 टक्के बिबटे आपल्या देशातल्या जंगलात असताना, त्यांची इथली अस्तित्वासाठी लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. हत्ती, सिंह, पट्टेरी वाघ, बिबटे अशा जंगली श्वापदांची लक्षणीय संख्या आपल्या देशात असताना जगण्यासाठी त्यांच्या सध्या असलेल्या नैसर्गिक अधिवासात मानवी समाजाशी होणारा संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. एका बाजुला सरकारी यंत्रणेने नियोजनबद्ध राबविलेल्या योजनांमुळे संकटग्रस्त स्थितीतल्या जंगली श्वापदांच्या संख्येत समाधानकारक सुधारणा झालेली असताना दुसऱया बाजुला मानवी समाजाच्या विलक्षणरितीने वाढणाऱया संख्येपायी त्यांचे करुण मृत्यू उद्भवत आहेत.
भारत देश जगभरातल्या जैविक संपदेच्या एकंदर अस्तित्वाच्या दृष्टीने महावैविध्यपूर्ण गणल्या गेलेल्या सतरा देशांच्या मांदियाळीत एक आहे. पृथ्वीतलावरचा केवळ 2.4 टक्के भूभाग भारतात असताना जैविक संपदेचे आठ टक्के वैभव इथे आहे. त्यावरून आपल्या देशाचे जैविक संपदेच्या दृष्टीने असलेले स्थान जागतिक स्तरावर अधोरेखीत झालेले आहे. पूर्वेकडच्या हिमालय पर्वताच्या उत्तुंग आकाशाशी स्पर्धा करणाऱया रांगा, राजस्थानातले अथांग वाळवंट, अरबी सागराला समांतर भिडणारी पश्चिम किनारपट्टी, प्राचीन शिलाखंडांना कवेत मिरविणारा पश्चिम घाट, अंदमान, निकोबार आणि लक्षद्विपाने युक्त असंख्य बेटांचा समुदाय, पश्चिम बंगालातले खारफुटीच्या जंगलांचे वैभव मिरवणारे सुंदरबन अशा परिसंस्थांनी परिपूर्ण आहे. गेल्या कित्येक शतकांपासून भारतातल्या नाना जातीजमातींनी इथल्या वन्यजीवांशी असलेले अनुबंध टिकविले होते परंतु वाढत्या लोकसंख्येपायी औद्योगिकीकरण, शहरीकरणाच्या रेटय़ापायी निर्माण झालेल्या मानव-वन्यजीव यांच्यातल्या तणावाच्या परिस्थितीमुळे दोन्ही घटकातले संबंध बिघडलेले आहेत. त्यापायी इथली विलोभनीय असणारी जैविक संपदा नानाविध संकटांनी संत्रस्त झालेली आहे. एकेकाळी भारतीय जंगलाची शान असणारा चित्ता वारेमाप शिकारीच्या प्रस्थामुळे पूर्णपणे इतिहासजमा झालेला आहे. आपल्या चापल्यासाठी आणि एकंदर रुबाबामुळे जगभरात आकर्षण बिंदू ठरलेला चित्ता संरक्षण आणि संवर्धनाभावी कुत्र्याच्या मौतीने ठार मारण्यात आला. आज अशीच काही परिस्थिती जम्मू आणि काश्मीर काळवीट हंगुल, जंगली डुक्कराच्या आसाममध्ये आढळणाऱया पिग्मी हॉग, मणिपुरच्या कैबूल लामजाव राष्ट्रीय उद्यानातील संगाई मृग, पश्चिम घाटातल्या शोला जंगलात आढळणाऱया निलगीरी ताहिर जंगली मेंढय़ाच्या प्रजातीवर बिकट परिस्थिती आलेली आहे. भारतातल्या वैविध्यपूर्ण अशा पर्यावरणीय परिसंस्थेत जुळवून घेत हे जंगली प्राणी इथे पूर्वापार राहिलेले असून आज विकास प्रकल्पाच्या वावटळीत त्यांचे अस्तित्वच बेदखल करण्यात आलेले आहे. जसा चित्यासारखा देखणा, चपळ, निर्भयी प्राणी भारताच्या जंगलातून कायमचा लोप पावला त्याचप्रमाणे आज इथे नांदणारी जैविक संपदेची वैशिष्टय़े विस्मृतीच्या उंबरठय़ावर पोहोचलेली आहेत.
राजेसरदारांच्या शिकारीच्या शौकापायी हा हा म्हणता चित्ता कधी नष्ट झाला हे भारतीय लोकमानसाला मोक्याच्याक्षणी काहीमात्र उमजले नाही आणि त्यामुळे तो प्राणी इतिहास म्हणून शिकविला जात आहे. चित्त्यापाठोपाठ देशातील वाघ, सिंहसुद्धा इतिहासजमा होणार होते परंतु त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने भारत सरकारने योग्यवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यामुळे त्यांच्या संख्येत अभिवृद्धी झाल्याचे स्पष्ट झाले. आज त्यांची संख्या धोक्याच्या वळणावर पोहोचलेली नाही असे मानले जात असले तरी त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर संकटे कोसळत असल्याकारणाने आगामी काळात नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात अपयश आले तर त्याची जबरदस्त किंमत आम्हाला फेडावी लागणार आहे. वन्यजीवांचे अस्तित्व आणि अधिवास टिकावा आणि वृद्धींगत व्हावा म्हणून भारतीय वन्यजीव मंडळ 1952साली अस्तित्वात आले.
1955 सालापासून वन्यजीव दिवस साजरा करण्यात येऊ लागला. 1957पासून वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणाच्या बाबतीत लोकजागृती व्हावी म्हणून 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर असे आठवडाभर वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊ लागले. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थीपिढी ही राष्ट्राचे वर्तमान आणि भवितव्य आहेत. त्यांना वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या उपक्रमांत सहभागी करण्यासाठी वन्यजीव सप्ताहाचे 66वे वर्ष असून यंदा मानव आणि वन्यजीव यांच्यात पूर्वापार असलेल्या स्नेहबंधांना सुदृढ करण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. देशभरात वन्यजीवांसाठी हक्काचा नैसर्गिक अधिवास म्हणून 112 राष्ट्रीय उद्याने आणि 515 अभयारण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. केवळ तेथेच नव्हे तर अन्यत्रही त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी नियोजनबद्ध पण ठोस अशा प्रयत्नांची आज विशेष गरज आहे.
– राजेंद्र केरकर