वृत्तसंस्था/ चेन्नई
शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱया पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाने मंगळवारी सरावाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे इंग्लंडनेही सराव सुरू केला आहे. या मालिकेत चार कसोटी होणार असून पहिल्या दोन कसोटी चेन्नईतच होणार आहेत.
प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी प्रोत्साहित करणारे भाषण देत संघातील सर्व खेळाडूंचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर सर्व खेळाडूंनी ट्रेनिंगला प्रारंभ केला. ‘चेन्नईत आज संघाचा सरावाचा पहिला दिवस होता. यावेळी प्रमुख प्रशिक्षक शास्त्री यांनी प्रोत्साहनपर भाषण करीत त्यांचे स्वागत केले,’ असे बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून सांगितले. तसे पाहिल्यास कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारीच आऊटडोअर ट्रेनिंग सुरू केले आहे.
सहा दिवस क्वारंटाईनमध्ये असताना भारत व इंग्लंड दोन्ही संघांतील सर्व खेळाडूंची ठरावीक अंतराने तीनदा आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली आणि दोन्ही संघांतील सर्व खेळाडू त्यात निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला. त्यानंतर दोन्ही संघांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली. इंग्लंडच्या खेळाडूंचा अहवाल रविवारीच प्राप्त झाल्यानंतर ते क्वारंटाईनमधून बाहेर आले होते. रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघानेही मंगळवारी दुपारनंतर सरावाला सुरुवात केली. त्यांच्या संपूर्ण संघाने पहिल्यांदाच 2 ते 5 या वेळेत तीन तास सराव केला. ईसीबीनेही इंग्लंडचे खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले असल्याचे सोमवारीच जाहीर केले होते.