वृत्तसंस्था/मेलबर्न:
या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी आल्यानंतर त्यांना दोन आठवडय़ांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अध्यक्ष निक हॉकली यांनी सांगितले. यासाठी ऍडलेडमध्ये त्यांची सोय केली जाण्याची जास्त शक्यता आहे.
हॉकली यांचे हे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या मताशी पूर्णपणे विसंगत असून भारतीय संघाच्या दोन आठवडय़ाच्या क्वारंटाईनला विरोध असल्याचे गांगुली यांनी याआधीच स्पष्ट केले होते. सर्व खेळाडू व साहाय्यक स्टाफ यांना ट्रेनिंगसाठी क्वारंटाईन नियमांचे पालन करीत सर्वोत्तम सुविधा पुरविल्या जातील, ज्यामुळे त्यांची सामन्याची चांगली तयारी होईल, असेही हॉकली यांनी म्हटले आहे. ‘आरोग्य तज्ञांचे आणि संबंधित अधिकाऱयांचे मार्गदर्शन यासाठी घेतले जाणार आहे. साईटजवळ असो किंवा केंद्राच्या अगदी जवळ हॉटेलची सोय असो, तेथे विषाणूबाधेची अजिबात शक्यता असणार नाही आणि सर्वांसाठी जैवसुरक्षित परिसर असेल, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे,’ असेही ते म्हणाले.
फक्त भारतीय संघासाठीच नव्हे तर आयपीएलमध्ये सहभागी होऊन परतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठीही क्वारंटाईन सक्तीचे असेल. ऍडलेड ओव्हलवर हॉटेलची सोय असून तेथे सर्व सुविधा आहेत. पण इंग्लंडमधील ओल्ड ट्रफोर्ड किंवा एजीस बॉल यांच्यासारखे केंद्रांतर्गत हॉटेल ऍडलेडमध्ये नाही. अशा परिस्थितीत ऍडलेड ओव्हल व या मैदानाच्या पूर्वेकडील भागात नव्याने बांधलेले हॉटेल जैवसुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम असल्याचे हॉकली म्हणाले.
भारतीय संघ येईपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक पुन्हा सुरू होण्याची फार कमी शक्यता असल्याने सर्व खेळाडूंना ऑस्ट्रेलियन सरकार व आयसीसीच्या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. येथे आल्यानंतर त्यांची चांचणीही घेतली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघ या दौऱयात 3 कसोटी खेळणार असून पहिली कसोटी 3 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. याशिवाय तीन वनडे सामन्यांची मालिकाही होणार आहे.