नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दुसऱया फळीतील खेळाडूंचा भारतीय संघ जून महिन्यात आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 सामने खेळणार आहे. दि. 26 व 28 जून रोजी मॅलाहिदे येथे हे दोन्ही सामने होतील. क्रिकेट आयर्लंडने या वृत्ताला दुजोरा दिला. सर्व क्रिकेट प्रकारातील कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक रिषभ पंत व स्टार स्पीडस्टार जसप्रित बुमराह या मालिकेत सहभागी होण्याची फारशी शक्यता नाही. हे सर्व खेळाडू या कालावधीत इंग्लंडमध्ये दि. 1 ते 5 जुलै या कालावधीत होणाऱया एकमेव कसोटी सामन्याच्या तयारीत असणार आहेत.
‘भारत, न्यूझीलंड व अफगाणिस्तानचे संघ आयर्लंड दौऱयावर येणार आहेत तर आम्ही ब्रिस्टॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहोत. साहजिकच आमच्यासाठी हा आजवरचा सर्वात मोठा भरगच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम असेल’, असे ट्वीट क्रिकेट आयर्लंडने केले. भारतीय संघ इंग्लंड दौऱयापूर्वी आयरिश संघाविरुद्ध दोन टी-20 सामन्याने नव्या हंगामाची सुरुवात करेल, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
भारतीय क्रिकेट संघ मागील हंगामात होऊ न शकलेली पाचवी कसोटी दि. 1 जुलैपासून एजबॅस्टनमध्ये खेळेल. त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध 3 टी-20 व 3 वनडे असे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील 6 सामने दि. 7 जुलैपासून खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ यापूर्वी 2018 मध्ये आयर्लंडमध्ये खेळला आणि त्यांनी त्यावेळी 2 सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली होती.