न्यायालयाच्या निकालाचे स्वागत : विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया
बेळगाव / प्रतिनिधी
बाबरी पाडण्याच्या प्रकरणाचा निकाल बुधवारी लागणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष त्याकडे लागले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल देताना माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, खासदार साक्षी महाराज यांच्यासह बत्तीस जणांना निर्दोष ठरविले. यामुळे बेळगाव परिसरातील आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह विविध हिंदू संघटनांनी या निकालाचे स्वागत केले असून योग्य न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
निकालाने मला अत्यानंद :
शंकरगौडा पाटील-कर्नाटक राज्य दिल्ली प्रतिनिधी
बाबरी विध्वंस केल्याचा आरोप करत माजी उपपंतप्रधान अडवाणींसह मुरली मनोहर जोशी यांच्यासह बत्तीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने या सर्वांना निर्दोष ठरविल्याने अखेर सत्याचा विजय झाला. या निकालाने मला अत्यानंद झाला आहे. देशाची संस्कृती जपणारा हा निकाल आहे. याबद्दल बेळगावसह संपूर्ण देशवासीय समाधान व्यक्त करत आहेत. तसेच हा
सर्वांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शंकरगौडा पाटील यांनी दिली आहे.
सत्याची बाजू धरत निकाल : डॉ. बी. जी. शिंदे
गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही संघर्ष केला आहे. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह इतर भाजपवासियांनी रथयात्रा काढून जागृती केली. बाबरी मशीद पडण्यामध्ये या बत्तीस जणांचा काहीच संबंध नव्हता. केवळ जो इतिहास आहे तो त्यांनी मांडला होता. असे असताना या बत्तीस जणांवर बाबरी मशीद पाडल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने निवाडा देताना सत्याची बाजू धरत हा निकाल दिला. याचे मी व्यक्तीश: स्वागत करतो, असे डॉ. बी. जी. शिंदे म्हणाले. आता राममंदिर बांधणे सोपे जाणार आहे. हा संपूर्ण देशाचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निकालाचे स्वागत : राघवेंद्र कागवाड
न्यायालय हे सर्वोच्च आहे, हे बाबरी विध्वंस प्रकरणाच्या निकालावरून दाखविले आहे. जो निकाल लागला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बत्तीस जणांवर दोषारोप दाखल केले ते चुकीचे होते, हे आता न्यायालयाने या निकालावरून दाखवून दिले. 80 च्या दशकामध्ये जे जनआंदोलन केले त्यावेळी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उमा भारती यांनी केवळ जनतेसमोर खरा इतिहास सांगितला होता. असे असताना त्यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, न्यायालयाने निकाल देऊन सत्य अबाधित ठेवले याबद्दल आम्ही सर्व समाधानी आहोत, असे राजेंद्र कागवाड यांनी सांगत या निकालाचे स्वागत केले.
निकालामुळे न्यायालयावरचा विश्वास दृढ : किरण जाधव-कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेपेटरी
गेल्या कित्येक वर्षांपासून हा वाद होता. आता सर्वोच्च न्यायालयाने तो वाद निकालात काढून सत्य काय आहे ते दाखवून दिले. अखेर सत्याचा विजय झाला. यामुळे भावी काळात अयोध्येत राममंदिर उभे करून समस्त हिंदूंची इच्छा पूर्ण होणार आहे, हे निश्चित आहे. या निकालामुळे न्यायालयावरचा विश्वास दृढ झाला आहे. भारतीय संस्कृतीचादेखील विजय झाला असून बत्तीस जण निर्दोष झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे, असे किरण जाधव यांनी सांगितले.
धर्माचे रक्षण करणारा निकाल : डॉ. बसवराज भागोजी, विश्व हिंदू परिषद, जिल्हाध्यक्ष
सत्य हे सत्यच असते हे या निकालावरून उमगले आहे. माजी उपपंतप्रधान अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह बत्तीस जणांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आणि सत्याची बाजू उचलून धरली. या निकालावरून धर्माचे रक्षण करणारा हा निकाल असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिले. या निकालाबद्दल मी समाधानी आहे, असे डॉ. बसवराज भागोजी यांनी सांगितले.
बत्तीस जणांचा काहीच दोष नव्हता : हेमंत हावळ
राम मंदिराचा विध्वंस करून त्या ठिकाणी मशिदीचा ढाचा उभारण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देशावर इतरांचेच राज्य आहे, असे दिसत होते. मात्र हिंदूंनी तो अतिक्रमित ढाचा पाडून धर्माचे रक्षण केले. 6 डिसेंबर 1992 रोजी जे घडले त्यामध्ये या बत्तीस जणांचा काहीच दोष नव्हता. असे असताना त्यांना दोषी ठरविण्यात आले. मात्र सर्वोच्च्य न्यायालयाने सत्य जाणून घेऊन बुधवारी जो निकाल दिला तो संपूर्ण देशाच्या, धर्माच्या आणि संस्कृतीच्या रक्षणाचा निकाल दिला आहे, असे हेमंत हावळ यांनी सांगितले.