आमदार महांतेश कवटगीमठ : नागरमुन्नोळी येथे कल्याण मंडपाचे उद्घाटन
प्रतिनिधी / चिकोडी
युवा पिढीला भारतीय कला, संस्कृती, सामाजिक व धार्मिक चिंतन समजण्यासाठी जागृती व असे उपक्रम राबविण्यासाठी कल्याण मंडप आवश्यक आहेत. त्याच बरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनी या कल्याण मंडपाचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन सरकारचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी केले. नागरमुन्नोळी येथील बसवेश्वर देवस्थानाच्या कल्याण मंडपाच्या वास्तूशांती व उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
यावेळी बोलताना निडसोशीच्या सिद्ध संस्थान मठाचे श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी म्हणाले, श्रावण महिन्यात प्रवचन, श्रवण केल्यामुळे आत्मा व मन शुद्धी होत असते. असे कार्यक्रम करण्यासाठी कल्याण मंडप उपयुक्त ठरणार आहे. माणसाचे जीवन सार्थकी लागण्यासाठी भक्ती मार्गावरून वाटचाल करणे अत्यंत आवश्यक आहे. धकाधकीच्या जीवनापासून मुक्ती मिळविण्यासाठी सत्संगात सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बोलताना सार्वजनिकांना विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी असे कल्याण मंडप आवश्यक असून त्याचा सदुपयोग व्हावा, असे सांगितले. समितीचे अध्यक्ष दानाप्पा कोटबागी यांनी बोलताना सुसज्जित कल्याण मंडप निर्माण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्यात आले आहे. सुवर्ण ग्रामोदय योजनेअंतर्गत आमदारांनी 26 लाख रुपये तर विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी 11 लाख रुपये, माजी खासदार रमेश कत्ती यांनी 2.5 लाख रुपये, जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष सिद्धाप्पा मऱयाई यांनी 3 लाख रुपये अनुदान दिले असल्याचे सांगितले.
यावेळी हुबळी येथील सिद्धारुढ शांताश्रम मठाचे अभिनव सिद्धारुढ महास्वामी, गौरीशंकर मठाचे रेवणसिद्ध महास्वामी, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, महेश भाते, पवन कत्ती, सुरेश बेल्लद, सिद्धाप्पा मऱयाई, व्ही. बी. ईट्टी, शिवपुत्र मनगुळी, शंकर नेर्ली, महादेव चौगुला, डी. आर. कोटय़ाप्पगोळ, लक्ष्मीसागर ईट्टी, विनायक कुंभार, रमेश काळण्णवर उपस्थित होते.