सीमेवरील कडाक्याची थंडी चिनी सैनिकांना ठरली असहय़ : ड्रगनकडून रोबोटची फौज तैनात
वृत्तसंस्था /लडाख
लडाख क्षेत्रामधील कडाक्याच्या थंडीत भारतीय सैनिकांचा आता चिनी सैनिकांशी सामना होणार नाही. याऐवजी भारतीय सैनिकांसमोर चीनने स्वतःची रोबो आर्मी आणि अनमॅन्ड व्हेइकल्स उभे केले आहेत. तिबेटमधील कडाक्याची थंडी सहन करू न शकणाऱया स्वतःच्या सैनिकांना वाचविण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.
चीनने तिबेट आणि लडाख सीमेवर ऑटोमॅटिक आणि रोबोटप्रमाणे वापरल्या जाणाऱया वाहनांना तैनात केले आहे. भारतीय सैन्यासोबत झालेल्या झटापटीनंतर चिनी सैनिकांना थंडीचा प्रकोप सहन करावा लागला होता. चिनी सैनिक बर्फाळ भागातील लढाईसाठी पूर्णपणे तयार नसल्याची बाब त्यानंतर समोर आली होती.
88 शार्प क्लॉ व्हेइकलस
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तिबेटमध्ये ऑटोमॅटिक चालणाऱया 88 शार्प क्लॉ व्हेइकल्सना तैनात केले आहे. यातही 38 शार्प क्लॉ वाहने लडाख सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. चीनची शस्त्रास्त्र कंपनी नॉरिन्कोने या अत्याधुनिक वाहनांची निर्मिती केली आहे. या वाहनांचा वापर टेहळणीसह शस्त्रास्त्र तसेच आवश्यक सामग्रीच्या पुरवठय़ाकरता केला जाईल.
म्यूल-200 व्हेइकल्स
चीनने तिबेटमध्ये ऑटोमॅटिक म्यूल-200 अनमॅन्ड व्हेइकल्स देखील तैनात केले आहेत. ही वाहने अवघड प्रदेशात टेहळणीसह 50 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. याचबरोबर त्यांच्यावरून एकाचवेळी 200 किलोग्रॅमहून अधिक दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक केली जाऊ शकते. वायरलेसद्वारे देखील नियंत्रित होऊ शकणारी ही वाहने रोबोटप्रमाणे लढाई लढू शकतात. सध्या तिबेटमध्ये 120 म्यूल-200 वाहने असून यातील बहुतांश भारतीय सीमेनजीक तैनात आहेत.
रुग्णवाहिकांप्रमाणे देखील वापर
पीएलएकडे सैनिकांना नेण्यासाठी व्हीपी-22 माइन रेसिस्टेंट ऍम्ब्युश प्रोटेक्टेड व्हेइकल्स देखील आहेत. त्यांचा वापर रुग्णवाहिकांप्रमाणे केला जाऊ शकतो. या वाहनांमधून एकाचवेळी 15 जणांना हलविले जाऊ शकते. तिबेटमध्ये 77 व्हीपी-22 असून यातील 47 च्या आसपास भारतीय सीमेनजीक तैनात आहेत.
लिंक्स ऑल-टेरेन वाहन
तिबेटमध्ये 200 लिंक्स ऑल-टेरेन वाहने देखील असून याद्वारे सैनिकांना हलविण्यासह शस्त्रास्त्रs तसेच हवाई सुरक्षा अस्त्रांसाठी प्लॅटफॉर्म म्हणून देखील वापर केला जाऊ शकतो. सध्या 150 लिंक्स ऑल-टेरेन वाहने लडाखनजीक आहेत.
लडाखमध्ये तणाव
भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षाच्या मे महिन्यापासून लडाखमध्ये तणाव आहे. यादरम्यान गलवान खोऱयात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. ज्यात 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते. चिनी सैनिकांना या कडाक्याच्या थंडी असलेल्या भागातील लढाईचा अनुभव नाही.