ज्ञान आणि तंत्रज्ञान प्रत्येक देश आणि समाजाचे दिशादर्शक ठरते. राष्ट्रीय स्तरावर सध्याच्या प्रगत काळात आर्थिक, सामाजिक, प्रगतीविषयक प्रत्येक क्षेत्रात वेळेत व विशेष प्रगती साधण्यासाठी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिली तरच प्रगती साधली जाऊ शकते, हे आता सर्वमान्य असून उद्योग आणि विविध व्यवसाय क्षेत्रांप्रमाणे स्टार्टअप-उद्योगपण अपवाद नाही. त्याचाच हा गोषवारा-
नवीन आणि नाविन्यपूर्ण कामकाजाला विधायक, संशोधनपर व आगळय़ावेगळय़ा पद्धतीने काम करण्याची कार्यसंस्कृती व कामकाज पद्धतीमध्ये भारताने आता आपले विशेष स्थान निश्चितच प्राप्त आणि प्रस्थापित केले आहे. नव्याने प्रचलित व वेगाने प्रस्थापित होणाऱया युनिकॉर्न्सनी भारतीय उद्योग क्षेत्राला नवे आयाम व व्यापक आर्थिक स्थैर्य तर दिलेच, शिवाय आव्हानपर परिस्थितीवर यशस्वी मात करून आर्थिक-व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीपथावर असणाऱया विशेषतः स्टार्टअपसारख्या प्रगतीशील क्षेत्राला मोठेच आर्थिक-व्यावसायिक पाठबळ दिले आहे.
भारतात नजीकच्या भविष्यात सुमारे दीड कोटी विद्यार्थी नव्याने रोजगार-स्वयंरोजगार क्षेत्रात प्रवेश करणे अपेक्षित आहे. या वाढत्या विद्यार्थ्यांना केवळ परंपरागत स्वरुपातच नव्हे तर नव्या व कल्पक स्वरुपात संधी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे ठरते. याच अनुषंगाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या जोडीलाच ‘अटल इनोव्हेशन मिशन’च्या माध्यमातून नवे व कल्पक स्वरुपाचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामागे व्यवसाय क्षेत्रातील एमएसएमई क्षेत्रासह विशेषतः स्टार्टअप्समध्ये छोटेखानी पण नवे व कल्पक प्रयोग करून त्याद्वारा रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे निर्माण व्हावेत व त्याच्याच जोडीला एमएसएमईसह उद्योग-व्यवसाय क्षेत्राला अधिक प्रगतावस्था प्राप्त व्हावी, हे मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आले होते.
व्यवसायातील लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांना बदलत्या व्यावसायिक गरजा व आव्हानांनुसार त्यांना नवे स्वरुप प्राप्त होणे क्रमप्राप्त होते. वाढता व्यावसायिक व्यापक व व्यवसाय-विक्री विषयक आव्हानांचा तो अपरिहार्य परिणाम होता. त्याच्याच जोडीला बदलत्या तंत्रज्ञानानुरुप व व्यावसायिक स्पर्धेवर मात करून यशस्वी होण्यासाठी आगामी गरजांनुरुप जडणघडण घडविणे ही नव्या व लघुउद्योजक आणि उद्योगांची मोठी मागणी होती.
त्याच्याच जोडीला विज्ञानाशिवाय माहिती-तंत्रज्ञानाचा केवळ आवश्यक स्वरुपातच नव्हे तर आगामी काळातील गरजा लक्षात घेऊन नव्याने उद्योग क्षेत्रात येणाऱयांसाठी पूरक असे विशेष व नाविन्यपूर्ण प्रयत्न करणे अर्थातच आवश्यक होते. मुख्य म्हणजे उद्योग-व्यवसायाच्या विशेष व बदलत्या गरजांची वेळेत व पुरेशा संख्येत कर्मचारी उपलब्ध होणे हे अर्थातच मोठे आव्हान होते. या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जात असतानाच कर्मचाऱयांना ज्ञान-तंत्रज्ञान वा कौशल्य-कामगिरी यांच्यासह कर्मचाऱयांना मर्यादित संख्येत असतानासुद्धा कार्यक्षम करण्यासाठी यासाठी सुद्धा स्टार्टअप्सारख्या कल्पक प्रयत्नांनी मोठी कामगिरी बजावणे हे अपेक्षित होते व तसे झालेसुद्धा.
कल्पक व कृतीशील उद्यमशील प्रयत्नांना पूरक ठरण्यासाठी जी पार्श्वभूमी तयार करण्यात आली, त्यामध्ये खालील घटकांचा महत्त्वपूर्ण सहभाग व योगदान अपेक्षित होते. ते पुढीलप्रमाणे-
शैक्षणिक पात्रता- शिक्षणाच्या योग्य व परिणामकारक वापरामुळे विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडू शकतात. शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या जोडीलाच अभ्यासक्रमाशिवाय कर्तृत्वाला कल्पकतेची साथ कशी द्यावी, नाविन्यापोटी नव्या उद्योग संकल्पना कशा साकाराव्यात, नव्या निर्णयांची अंमलबजावणी कशी करावी, प्रयत्नातून प्राविण्य कसे साधावे या आणि यासारखे मूलभूत व महत्त्वाचे मुद्दे शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्यास व त्यांना त्यादृष्टीने प्रशिक्षण दिल्यास विद्यालयांपासून विद्यापीठांपर्यंत शिक्षण घेणाऱया आपल्या विद्यार्थ्यांमधून उद्याचे उद्योजक घडविता येतील.
वैयक्तिक मानसिकता- कुठल्याही प्रयत्नांच्या यशासाठी मानवी प्रयत्नांना समर्पक मानसिकतेची जोड मिळणे आवश्यक असते. मुख्यतः मानसिकता ही व्यक्तिगत बाब असली तरी त्याला प्रयत्न आणि सातत्यापोटी सकारात्मक स्वरुप निश्चितच दिले जाऊ शकते. ही सकारात्मकता साधल्यास व्यक्ती अगदी विद्यार्थी दशेपासून कल्पक प्रयत्नशील होऊ शकतील. याच मूलभूत भूमिकेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने उलट इनोव्हेशन मिशनचा विशेष व नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. अल्पावधीतच या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर संस्थात्मक स्वरुप प्राप्त होत गेले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
अटल इनोव्हेशन मिशनचेच एक दृश्य स्वरुप म्हणजे गेल्या काही वर्षात नव्याने नोंदणी होणाऱया व वाढणाऱया स्टार्टअपची संख्या व त्यांना नव्याने लाभलेली युनिकॉर्नची साथ. नव्या स्टार्टअपची संख्या प्रेरक तर युनिकॉर्न्सची संख्या व्यावसायिक संदर्भात नक्कीच परिणामकारक ठरली आहे. ही प्रक्रिया पुढे अधिक गतीमान होण्याची गरज मात्र आहे.
अटल इन्क्मयुबेशन सेंटरने शालेय स्तराशिवाय विद्यापीठ, विविध संस्था व उद्योग स्तरावर नवसंकल्पना केंद्रांची यशस्वीपणे सुरुवात केली आहे. या केंद्रांचा मुख्य उद्देश भारतात प्रचलित उद्योगांना नवीन व कल्पक व्यवसाय कल्पना व कार्यपद्धतीसह सहकार्य करतानाच नवीन स्टार्टअप उद्योगांना प्रेरणा-प्रोत्साहन देणे हा आहे. संख्यात्मक स्वरुपात सांगायचे झाल्यास 2021 पर्यंत अटल इन्क्मयुबेशन सेंटरच्या 68 शाखा कार्यक्षम स्वरुपात सुरू आहेत. आगामी चार वर्षात या केंद्रांची संख्या शंभरी नक्कीच पार करेल.
अटल इन्क्मयुबेशन सेंटरच्या या प्रचलित व प्रस्तावित केंद्रांद्वारे स्टार्टअपसाठी तंत्रज्ञानविषयक माहिती उपलब्ध करून देणे, तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन, व्यवसायवाढीसाठी वित्तीय साहाय्यविषयक मार्गदर्शन, व्यावसायिक संवाद-संपर्क उपलब्ध करून देणे, गरजेनुरुप साधनसामग्री उपलब्ध करून देणे, गरजेनुरुप प्रयोगशाळांचा वापर, विविध विषय तज्ञांद्वारा सल्ला-मार्गदर्शन, बँका व वित्तीय सेवा संपर्क, उद्योग विकास व विशेषतः लघुउद्योग क्षेत्रातील सरकारी विभागांशी समन्वय साधणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामे या केद्रांद्वारा होत असतात.
– दत्तात्रय आंबुलकर