वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाच्या पुर्नबांधणीसाठी माजी हॉकीपटू हरजित सिंग आणि देविंदर वाल्मिकी यांची हॉकी इंडियाला नितांत गरज भासत असल्याचे प्रतिपादन भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रामध्ये भारतीय हॉकी संघ मजबूत आणि दर्जेदार होण्याची सध्या गरज आहे. हॉकी इंडियाला माजी हॉकीपटू हरजित सिंग आणि देविंदर वाल्मिकी यांचा विसर पडल्याचे जाणवते. आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाला बलवान बनविण्याकरिता हरजित सिंग आणि देविंदर वाल्मिकी यांना तातडीने मार्गदर्शनासाठी बोलाविणे गरजेचे आहे, असेही हरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे किमान सहा महिन्यांच्या कालावधीत हॉकी क्षेत्रातील सर्व हालचाली ठप्प झाल्या होत्या. गेल्या ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने टर्फवरील प्रो लीग हॉकी स्पर्धेला प्रारंभ केला होता. भारताच्या कनिष्ठ पुरूष आणि महिला हॉकी संघांचा दर्जा इतर देशांच्या तुलनेत खूपच खाली असल्याचे या संघातील खेळाडूंना जाणवत आहे. बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये या दोन्ही संघाचे सराव शिबीर घेण्यात आले आहे. 2016 साली कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱया भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरजित सिंगने केले होते. या स्पर्धेनंतर हरजितचा भारताच्या वरिष्ठ संघात समावेश झाला होता.