नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, देशातल्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. १०० वर्षांनंतर अशी भयानक साथीच्या आजाराची परिस्थिती जगावर उद्भवली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. अनेक लोक या कोरोनाच्या संकटातून जात आहेत. लोक ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहेत, त्याची जाणीव मला देखील आहे. जनतेचं दुःख मला समजतंय, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत, असं म्हणत नरेंद्र मोदींनी देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, तसेच नागरिकांना लस घेण्याचं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले. लस घेतली तरीही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच देशात आत्तापर्यंत १८ कोटी लोकांनी लस घेतल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते.