माईक पाँपिओ आणि मार्क एस्पर भारताच्या दौऱयावर
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री माईक पाँपिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्या महत्वपूर्ण भारत दौऱयाला सोमवारपासून प्रारंभ झाला असून रात्री उशीरा दोन्ही देशांमध्ये संरक्षण माहिती आदानप्रदानाचा महत्त्वाचा करार झाला आहे. या करारावर स्वाक्षऱयाही झाल्या आहेत. असा करार असावा अशी भारत दोन दशकांपासून सातत्याने मागणी करीत होता. ती पूर्ण झाली आहे.
अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबरला अध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीपूर्वीचा हा अमेरिकन मंत्र्यांचा शेवटचा महत्त्वाचा दौरा असेल. अमेरिकेतील निवडणुकीचा परिणामही भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
2 अधिक 2 चर्चा
माईक पाँपिओ यांनी भारताचे विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांच्याशी तर मार्क एस्पर यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी भारतात आल्याबरोबर चर्चा केली. हे चारही नेते आज मंगळवारी एकत्र चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध, प्रशांत महासागरीय प्रदेशातील परिस्थिती, चीनचा वाढता विस्तारवाद, भारत-अमेरिका सामरिक संबंध, तसेच जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका यांचे ‘क्वाड’ गटबंधन अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर हे नेते सविस्तर चर्चा करतील.
काय आहे करार
भारत आणि अमेरिका यांच्यातील माहिती आदान-प्रदान कराराला बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन ऍग्रिमेंट (बीईसीए) असे नाव आहे. या करारानुसार भारताला अमेरिकेचे उच्चप्रतीचे शस्त्रतंत्रज्ञान, सामरिक साहाय्यता, संवेदनशील उपग्रहीय माहिती, गोपनीय माहिती आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळणार आहे, असे तज्ञांनी स्पष्ट केले. 2018 मध्ये भारताने अमेरिकेशी ‘कोमकासा’ हा महत्त्वपूर्ण करार केला होता. तर 2016 मध्ये ‘लेमोआ’ हा करार करण्यात आला होता.
पायाभूत सज्जता पूर्ण
अमेरिकेने असा करार पश्चिम युरोपीय देशांसह केला आहे. तसा भारताशी करार झाल्यामुळे ते महत्वाचे पाऊल मानण्यात आले आहे. त्यामुळे या कराराकडे चीनचेही बारकाईने लक्ष असेल असे तज्ञांचे मत आहे. सध्या लडाख येथील संघर्षामुळे भारताचे चीनशी संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर या कराराचे बळ भारताला मिळणार असून त्याची बाजू भक्कम होणार हे निश्चित मानले जाते.