वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांनी संरक्षण आणि औद्योगिक सुरक्षा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संरक्षण सहकार्याचे अदानप्रदान करणे सुलभ होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. भारत आणि अमेरिका औद्योगिक सुरक्षा कराराअंतर्गत हा गट काम करणार आहे. दोन्ही देशांचे संरक्षण उद्योग एकमेकांच्या संपर्कात राहणार असून महत्त्वाच्या माहितीचे अदानप्रदान त्यांच्यात केले जाणार आहेत.
अमेरिकेकडून भारताला अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान मिळू शकते. मात्र, या तंत्रज्ञानाची गोपनियता आणि सुरक्षितता सुनिश्चित करावी लागणार आहे. या सुनिश्चतेची रुपरेषा ठरविण्याचे कार्य हा गट करणार असून त्याला तसे अधिकार दोन्ही देशांकडून मिळणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
औद्योगिक सुरक्षा करार डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आला होता. या कराराचे क्रियान्वयन आता वेगाने होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन असताना हा करार करण्यात आला होता. आता बायडन यांच्या प्रशासनानेही तो कायम ठेवला असून लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार अशी ओळख दिली आहे.
2018 मध्ये दोन्ही देशांनी कोणतासा करार केला होता. त्यानुसार दोन्ही देशांची सेना दले एकमेकांच्या थेट संपर्कात आणण्यात होती. उच्च दर्जाचे संरक्षण तंत्रज्ञान भारताला मिळण्याचा मार्ग या करारामुळे मोकळा झाला आहे. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशामध्ये पायाभूत सहकार्य करार झाला होता.