मंगळवारपासून दोन्ही संघ सरावाला सुरुवात करणार
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारत व इंग्लंड संघातील खेळाडूंच्या सहा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत कोव्हिड 19 साठी तीन चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यात सर्व खेळाडू निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीआधी दोन्ही संघांतील खेळाडूंना आता पूर्ण क्षमतेने सराव करता येणार आहे. पहिली कसोटी येथे 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा पूर्ण करून आल्यावर भारतीय खेळाडूंनी काही काळ आपल्या कुटुंबियांसमवेत घालविल्यानंतर गेल्या बुधवारपासून ते इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी बायो बबलमध्ये तुकडय़ा तुकडय़ांनी दाखल झाले होते. ‘भारतीय संघाने सहा दिवसांचे क्वारंटाईन आज सोमवारी पूर्ण केले. या कालावधीत ठरावीक अंतराने त्यांच्या तीनदा आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्या गेल्या आणि सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पाचनंतर त्यांचे आऊटडोअर सत्र सुरू झाले. मंगळवारी ते जाळय़ातील सरावाला सुरुवात करणार आहेत,’ असे बीसीसीआयने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
लंका दौऱयावर न गेलेले बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, रॉरी बर्न्स यांनी याआधीच क्वारंटाईन पूर्ण केले असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. इंग्लंडचे सर्व खेळाडूंही कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले असल्याने मंगळवारी दुपारपासून तेही सरावाला सुरुवात करतील, असे ईसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. इंग्लंड संघ गेल्या बुधवारी लंकेतील मालिका संपवून थेट चेन्नईत दाखल झाला आहे. इंग्लंडने लंकेतील मालिका जिंकली तर भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत गेल्या तीन वर्षात दुसऱयांदा नमविल्याने त्यांचे मनोबल खूपच उंचावलेले आहे.