नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंडविरुद्ध मायभूमीतच होणारी मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका लांबणीवर टाकली जाईल, अशी शक्यता असून या निर्णयाची लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार ही मालिका सप्टेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. न्यूझीलंड अ क्रिकेट संघ भारत दौऱयावर येणार असून या मालिकेवर देखील कोव्हिड-19 चा विपरीत परिणाम होऊ शकतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या दोन्ही मालिकांवर लवकरच निर्णय घेईल. मात्र, किती कालावधीकरिता या मालिका लांबणीवर टाकल्या जातील, ही कालमर्यादा निश्चित करणे मंडळासाठीही कठीण असेल.
‘इंग्लंडचा संघ सप्टेंबरमधील दौऱयात 3 वनडे व 3 टी-20 असे 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत इंग्लंडचा संघ भारतात येऊ शकणार नाही’, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. शुक्रवारी मंडळ कार्यकारिणीची बैठक होईल, त्यावेळी भारताचे फ्यूचर टूर्स अँड प्रोग्रॅम (एफटीपी) कॅलेंडर निश्चित करणे, हा बैठकीचा मुख्य मसुदा असणार आहे.
न्यूझीलंड अ क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये भारत दौऱयावर येणे अपेक्षित होते. पण, या मालिकेबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. ब्रिटीश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धची आगामी मालिका पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे.
भारतात सध्या कोव्हिड-19 चे 9 लाख पॉझिटिव्ह असून यातील मृतांचा आकडा 25 हजारच्या वर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर भारत यात तिसऱया स्थानी आहे. ‘परिस्थिती अनुकूल असेल तर मंडळ ऑगस्टमध्ये शिबिर आयोजित करेल, असे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यापूर्वी म्हटले आहे. ते पाहता इतक्या लवकर सामने आयोजित केले जाणे अशक्य कोटीतील आहे’, असे बीसीसीआय पदाधिकाऱयाने स्पष्ट केले.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ातील इंग्लंडचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियातील आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली जाणे जवळपास निश्चित असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यास याच कालावधीत आयपीएल स्पर्धा भारतात किंवा विदेशात खेळवली जाणे अपेक्षित आहे. भारतीय क्रिकेट संघाने मार्चमध्ये मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची आंतरराष्ट्रीय लढत खेळली. कोव्हिड-19 मुळे ती मालिका अर्ध्यावरच गुंडाळावी लागली होती.