लंडन / वृत्तसंस्था
युके प्रशासनाने कोव्हिड-19 चे सर्व निर्बंध हटवले असून यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिकेसाठी स्टेडियम हाऊसफुल्ल होण्याचा मार्ग खुला झाला आहे. इंग्लंडमध्ये यापूर्वी जमावबंदी होती. शिवाय, अन्य अनेक बंधने होती. मात्र, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सर्व बंधने मागे घेत असल्याची घोषणा केली. इंग्लंडमध्ये आता नागरिकांना फेस मास्क वापरण्याची सक्ती नसेल. शिवाय, इनडोअर, आऊटडोअर, स्पोर्ट्स इव्हेंट्सवर देखील बंदी नसेल. भारत-इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका दि. 4 ऑगस्टपासून सुरु होत आहे. भारतीय खेळाडू सध्या ब्रेकवर असून ते दि. 14 जुलै रोजी एकत्रित येतील. यापूर्वी भारत-न्यूझीलंड यांच्यात इंग्लिश भूमीतच आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची फायनल झाली, त्यावेळी केवळ 4 हजार चाहत्यांना प्रवेश दिला गेला होता.
विम्बल्डनवर अश्विन…
भारताचा आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेतील एका लढतीला हजेरी लावली आणि याचे छायाचित्र आवर्जून इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंना सध्या इंग्लंडमध्ये 3 आठवडय़ांची सुटी दिली गेली आहे.