चेन्नई / वृत्तसंस्था
भारत-इंग्लंड मालिकेतील चेन्नईत खेळवल्या जाणाऱया पहिल्या दोन कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे तामिळनाडू राज्य क्रिकेट संघटनेने जाहीर केले. कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे सचिव आर. एस. रामास्वामी यांनी ईमेलद्वारे स्पष्ट केले. कोव्हिड-19 मुळे खेळाडूंची सुरक्षितता सर्वप्रथम जपली जावी, यासाठी बीसीसीआयने सर्वोच्च प्रयत्न केले आहेत. त्याचाच हा एक भाग आहे, असे रामास्वामी यांनी नमूद केले. उभय संघातील पहिली कसोटी दि. 5 ते 9 फेब्रुवारी व दुसरी कसोटी 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ चेन्नईत दि. 27 जानेवारीपर्यंत दाखल होतील व बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी देतील, असे संकेत आहेत.