वृत्तसंस्था/ कोलकाता
पुढील वर्षीच्या प्रारंभी इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे.
इंग्लंडच्या भारत दौऱयाचा संपूर्ण कार्यक्रम अद्याप जाहिर झालेला नाही. दरम्यान अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर इंग्लंड आणि भारत यांच्यात दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळविण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे गांगुली यांनी मंगळवारी येथे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. इंग्लंडच्या या प्रदीर्घ दौऱयात 4 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळविण्याचे गांगुली यांनी सूचित केले आहे. देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा वारंवार घेतला जात असून इंग्लंडमध्येही कोरोनाची परिस्थिती पुन्हा बिकट होत असल्याने या दौऱयापूर्वी दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये चर्चा केली जाईल. 14 व्या इंडियन प्रिमियर लिग स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत गांगुली यांनी ही माहिती दिली. पुढील वर्षातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा भारतातच भरविण्याचे प्रयत्न राहतील, असे संकेतही त्यांनी दिले. इंग्लंड आणि भारत यांच्यात टी-20 चे पाच सामने खेळविले गेले तर कोहलीच्या संघाला आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी कसोटी मालिकेबाबत बोलताना गांगुली यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय संघ 13 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियात दाखल झाला. भारतीय क्रिकेटपटूंना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या क्वारंटाईन कालावधी मंगळवारी संपत आहे. भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. कसोटी मालिकेतील केवळ एकमेव सामना कर्णधार कोहली खेळणार असून त्यानंतर तो मायदेशी परतणार आहे. बीसीसीआयतर्फे त्याला मायदेशी परतण्यासाठी अधिकृत परवानगी दिल्याचे गांगुली यांनी सांगितले.