वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोना महामारी समस्येमुळे रद्द करण्यात आला होता. या मालिकेत भारताने इंग्लंडवर 2-1 आघाडी मिळविली आहे. आता विराट कोहलीचा संघ आणि रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ यांच्यात ही एकमेव कसोटी 2022 जुलैमध्ये खेळविली जाण्याची शक्यता आहे.
2022 जुलैमध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयात मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. या दौऱयावेळी मँचेस्टरमधील रद्द करण्यात आलेली पाचवी कसोटी खेळविण्याच्या निर्णयावर भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ आणि इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळांनी एकमत दर्शविले आहे. आता आयसीसीच्या मध्यस्थीनंतरच अर्धवट स्थितीत राहिलेल्या कसोटी मालिकेचा निर्णय निश्चित केला जाईल.
आयसीसीने या प्रस्तावाला होकार दिल्यास या कसोटी सामन्याची तारीख जाहीर केली जाईल. 2022 साली भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर वनडे मालिका आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी जाणार आहे.