वृत्तसंस्था/ मुंबई
एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत यजमान भारताचा सलामीचा सामना येथे गुरूवारी बलाढय़ इराण संघाबरोबर होणार आहे. या सामन्यात आक्रमक आणि वेगवान खेळ करत इराणची बचावफळी भेदण्यावर भारतीय संघाला लक्ष केद्रीत करावे लागेल, असे मत संघाचे प्रमुख प्रशिक्षक डेनरबी यांनी व्यक्त केले आहे.
सदर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रतेकरिता भारतीय महिला संघाला गुरूवारचा सामना सर्वात महत्त्वाचा आहे. अ गटात इराणचा संघ मानांकनात तळाच्या स्थानावर आहे. या गटात चीन आणि तैपेई यांचा समावेश आहे. फिफाच्या महिला फुटबॉल मानांकनात इराण 70 व्या तर भारत 55 व्या स्थानावर आहे. गुरूवारचा सामना भारताने जिंकला तर त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळविण्याची संधी मिळू शकेल. आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धा भारतात भरविली जात असल्याने देशातील महिला फुटबॉल क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे. 2019 साली भुवनेश्वरमध्ये झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात भारताने इराणचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला होता.