नवी दिल्ली/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशात दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्यांना अटक करत मोठा कट उधळून लावल्यानंतर आता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्येही काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली असून, भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता, असा मोठा आरोप केला आहे.
तसेच यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राहुल गांधी यांनी टीका केली होती. मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टोला लगावला होता. देशातील कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण मोहीम, लसींची टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई यांवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करताना दिसत आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून, मोदी सरकारने परराष्ट्र संरक्षण धोरणाचे राजकारण करून देशाला कमकुवत करण्याचे काम केले आहे. भारत एवढा असुरक्षित कधीच नव्हता, असा मोठा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.