विदेशमंत्र्यांची माहिती : नव्या भागिदारीचे प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारासंबंधी चर्चा सुरू आहे. चीनपुरस्कृत व्यापारी गटावर बहिष्कार घातल्यावर भारताकडून यासंबंधी प्रयत्न होत असल्याची माहिती विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.
रीजनल कॉम्प्रहेंसिव इकोनॉमिक पार्टनरशिपवर (आरसेप) भारताने स्वाक्षरी केलेली नाही तसेच यापासून अंतर राखले आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियासोबत मुक्त व्यापार करारावरून चर्चा सुरू असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे.
आशिया-प्रशांतच्या 15 देशांनी मागील महिन्यात आरसेपवर स्वाक्षरी केली होती. या देशांनी अमेरिकेला वगळून जगातील सर्वात मोठय़ा व्यापारी गटाची निर्मिती केली होती. भारत मागील वर्षी नोव्हेंबरमध्येच आरसेपमधून हटला होता. आरसेपमध्ये आसियानच्या 10 देशांसह चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सामील आहे.
संरक्षण संबंध बळकट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मजबूत संरक्षण संबंध आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारविषयक सहकार्य वृद्धिंगत होण्याची अपेक्षा असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. भारताने मागील महिन्यात ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपानसोबत दशकातील सर्वात मोठा सागरी युद्धाभ्यास केला होता.