वृत्तसंस्था / मेलबोर्न :
ऑस्ट्रेलियातील आगामी क्रिकेट हंगामात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जावी तसेच मालिकेत दिवस-रात्रीचा एक सामना असावा असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने केले आहे.
भारतीय क्रिकेट संघ येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. 2018-19 च्या दौऱयामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला एक कसोटी दिवस-रात्रीची खेळण्याची विनंती केली होती. पण भारताने ही विनंती मान्य केली नाही. आता ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱयावर तीन सामन्यांची वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मुंबई दाखल झाला आहे. दरम्यान भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयात कोहलीने दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळण्यास आपली तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी चर्चा करून आगामी कसोटी मालिका 4 ऐवजी 5 सामन्यांची खेळण्याचा निर्णय घ्यावा, असे मत वॉर्नने व्यक्त केले आहे.