वृत्तसंस्था/ कूलिज, अँटिग्वा
भारत व ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय़ युवा संघांत बुधवारी यू-19 विश्वचषक स्पर्धेतील दुसरी सुपरलीग उपांत्य लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
स्पर्धेआधी झालेल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरविले होते. तसेच Rया स्पर्धेवेळी भारताला मैदानाबाहेर कोव्हिड 19 संसर्गाशीही लढावे लागले होते. भारताच्या सहा खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने दोन सामन्यात उपलब्ध असलेल्या 11 खेळाडूंनिशी खेळावे लागले. अशा स्थितीतही भारताने शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले आहे. भारतीय संघाला या स्पर्धेची पुरेशी तयारी करण्याची संधी मिळाली नव्हती. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेकदा सराव शिबिरे रद्द झाली तर काही स्पर्धाही रद्द करण्यात आल्या होत्या. फक्त अलीकडेच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांना खेळण्याची संधी मिळाली होती.
चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या भारताने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली होती. पण लवकरच त्यांना कोरोनाच्या समस्येला सामोरे जावे लागल्याने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांना 11 खेळाडू मैदानात उतरवणेही कठीण झाले होते. 19 जानेवारीस झालेल्या या लढतीत पाच खेळाडू उपलब्ध नव्हते, त्यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शैक रशीद, आराध्या यादव, मानव पारख, सिद्धार्थ यादव यांचा समावेश होता. आयर्लंड व युगांडाविरुद्धच्या दोन्ही सामन्यात ते खेळू शकले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयला काही बदली खेळाडूंना पाठवण्याची सोय करावी लागली. या आव्हानाला सामोरे जात राखीवमधील सहा खेळाडूंना घेत भारताने आयर्लंडविरुद्ध शानदार प्रदर्शन केले आणि आयर्लंड व युगांडा या दोन्ही संघांवर विजय मिळविले. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात विद्यमान विजेत्या बांगलादेशला धूळ चारत उपांत्य फेरी गाठली.
आता सर्व खेळाडू उपलब्ध झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण ताकदीचा भारतीय संघ खेळणार आहे. दिलासा देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे निशांत सिंधूही कोरोनातून पूर्ण बरा झाला असून तोही या सामन्यासाठी उपलब्ध झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या प्रदर्शनाचा विचार करता भारताला फलंदाजीत फिनिशिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आयर्लंड व युगांडा हे संघ तुलनेने दुबळे असल्याने भारताने 5 बाद 307 व 405 अशा मोठय़ा धावसंख्या रचल्या आणि धावांच्या बाबतीतील सर्वात मोठा विजयही नोंदवला. आव्हानांवर मात करीत उपांत्य फेरी गाठल्याने बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. भारताने सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. फलंदाजीत भारतीय संघ भक्कम असून अंगकृश रघुवंशी, हरनूर सिंग, राज बावा, कर्णधार यश धुल व रशीद बहरात आहेत. गोलंदाजीत डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार, राजवर्धन हंगरगेकर, स्पिनर्स विकी ओस्तवाल, कौशल तांबे व मध्यमगती गोलंदाज राज बावा आक्रमणाची धुरा सांभाळतील. रवी कुमारने बांगलादेशविरुद्ध भेदक मारा करीत 5 बळी मिळविले होते.
दोनदा ही स्पर्धा जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत पाकवर विजय मिळविल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले असेल. त्यांचा सलामीवीर टीग्यू विली हा सुपरस्टार होण्याच्या मार्गावर असून या 17 वर्षीय खेळाडूने या स्पर्धेत फटक्यातील वैविध्य, आक्रमकता आणि टेम्परामेंट दाखवून देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकविरुद्ध त्याने 97 चेंडूत 71 जमविल्या असल्याने भारताला त्याला रोखण्याचे काम करावे लागेल. गोलंदाजीत विल्यम्स साल्झमन बहरात असला तरी भारतीय खेळाडू त्याला समर्थपणे तोंड देतील, अशी अपेक्षा आहे.