गोल्ड कोस्ट / वृत्तसंस्था
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून (गुरुवार दि. 30) एकमेव कसोटी खेळवली जाणार असून वनडे क्रिकेट मालिकेत संघर्षपूर्ण खेळ साकारल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्येही त्यात सातत्य राखण्याचा भारतीय महिला संघाचा उद्देश असणार आहे. उभय संघातील ही दिवस-रात्र कसोटी असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 10 वाजता या लढतीला सुरुवात होत आहे.
मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यापूर्वी केवळ दोनच सराव सत्रात आपला फॉर्म आजमावून पाहता आला. उभय संघात 3 वनडे सामन्यांची मालिका झाली, त्यात ऑस्ट्रेलियाने 2-1 असा विजय संपादन केला होता. भारतीय महिलांनी तिसरी औपचारिक लढत जिंकली. त्यापूर्वी, पहिले दोन्ही सामने जिंकत ऑस्ट्रेलियन महिला संघाने मालिकाविजय संपादन केला होता.
नोव्हेंबर 2017 मध्ये आपली शेवटची कसोटी खेळलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाला देखील या ऐतिहासिक कसोटीपूर्वी फारसा सराव करता आलेला नाही. दिवस-रात्र स्वरुपातील ही लढत गुलाबी चेंडूवर खेळवली जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलियाचे संघ 2006 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये आमनेसामने भिडले, त्यावेळी आताच्या संघातील फक्त मिताली राज व झुलन गोस्वामी यांचाच त्यात समावेश होता.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलियन महिला ः हेग लॅनिंग (कर्णधार), डॅर्सी ब्राऊन, मॅटलन ब्राऊन, स्टेला कॅम्पबेल, निकोला कॅरे, हॅना डॅर्लिंग्टन, ऍश्ले गार्डनर, ऍलिसा हिली, तहिला मॅकग्रा, सोफि मॉलिन्यूएक्स, बेथ मूनी, एलिसी पेरी, जॉर्जिया रेडेमेनी, मॉली स्ट्रनो, ऍनाबेल सुदरलँड, ब्लॅमेनिक, जॉर्जिया वेअरहॅम.
भारतीय महिला ः मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्यूज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष, एकता बिश्त.