मेलबर्न / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी-20 सामने खेळणार आहे. सप्टेंबरमध्ये ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. यंदाची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत आहे. ऑस्ट्रेलियन संघ याशिवाय, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, विंडीज व इंग्लंडविरुद्ध देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात काही सामने खेळणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. याशिवाय, पुढील वर्षात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये 4 कसोटी सामने खेळणार आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा संपन्न झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात 5 टी-20 सामने खेळणार आहे. ही मालिका दि. 9 ते 19 जून या कालावधीत होईल. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुधारित कार्यक्रमानुसार, पाचव्या व शेवटच्या एकमेव कसोटीसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. ही कसोटी मागील जुलैमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना उद्रेकामुळे सदर लढत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 3 टी-20 व 3 वनडे देखील खेळणार आहे.