आव्हान प्रतिकूल वातावरणाचे आणि प्रतिकूल प्रतिस्पर्ध्याचे देखील!
कसोटी चॅम्पियनशिप फायनल – भारत विरुद्ध न्यूझीलंड , काऊंटडाऊन – 33
विवेक कुलकर्णी
कम्फर्ट झोनमध्ये असणे आणि डिस-कम्फर्ट झोनमध्ये असणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लिश भूमीत न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मैदानात उतरेल, त्यावेळी डिस-कम्फर्ट झोन काय असतो, याची संघाला आणखी एकदा प्रचिती येऊ शकते. याला दोन कारणे आहेत, पहिले भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळताना बराच चाचपडतो आणि दुसरे म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत भारतीय संघ चाचपडतो म्हणजे चाचपडतोच!
साहजिकच, न्यूझीलंडचा चक्रव्यूह भेदायचा असेल तर भारताला चौकटीबाहेरचा खेळ साकारावा लागेल. तरच यशाची अपेक्षा करता येईल.
आकडेवारी पाहता, सध्या सुरु असलेल्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात 2 लढती झालेल्या आहेत आणि खेदाची बाब म्हणजे या दोन्ही लढती फक्त आणि फक्त न्यूझीलंडनेच जिंकलेल्या आहेत. थोडक्यात, इतिहास प्रतिकूल आहे.
वर्तमान मात्र त्या दृष्टीने (बरेच) बरे आहे. आघाडीचे खेळाडू, संघाचे मुख्य शिलेदार आणि काही टेस्ट स्पेशालिस्ट बहरात आहेत. सुदैवाने रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटमध्येही उत्तम जम बसला आहे. (त्याने 161 धावा झळकावल्या, म्हणूनच आपला संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे!).
एरवी, रोहित फुटवर्कच्या बाबतीत ‘लेझी बॅटस्मन’ म्हणून ओळखला जातो. पण, अलीकडील काही वर्षात यानंतरही त्याने आपल्या तंत्रात कमालीची सुधारणा केली आहे. त्यामुळे, फुटवर्क किंचीत का असेना, तरीही त्याचे फटके कव्हर्समधून वाऱयाच्या वेगाने जाताना दिसून आले आहेत. शुभमन गिलसारखा युवा फलंदाज न्यूझीलंडच्या काईल जेमिसन किंवा टीम साऊदीला सामोरे जाताना प्रगल्भता दाखवणार का, हा खरा कळीचा प्रश्न असेल.
सर्वप्रथम एक लक्षात घ्यावे लागेल की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची ही फायनल भारतात असती तर आपण न्यूझीलंडला पहिल्या तीन दिवसातच गुंडाळले असते. पण, आता एक तर ही फायनल त्या सीम आणि स्विंग गोलंदाजीला पोषक इंग्लिश भूमीत आहे आणि आपले कसोटीवीर त्यावर सातत्याने झगडतात. दुसरे म्हणजे न्यूझीलंडसारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर उभा ठाकलेला असणार आहे.
बांगलादेशचा अनुभवी फलंदाज तमिम इक्बालने मागे याच इंग्लिश भूमीत तीन शतके झळकावली होती. पण, त्याचे सुदैव म्हणजे सूर्यप्रकाश अगदी त्याच्या डोक्यावर होता आणि यामुळे धावा खोऱयाने ओढता येऊ शकत होत्या. पण, वातावरण ढगाळ असेल तर चेंडू अधिक सीम, स्विंग होत राहणार आणि अशा परिस्थितीत फलंदाज कितीही वाखाणलेला असो, त्याची त्रेधातिरपिट ही उडणारच, ही काळय़ा दगडावरची रेघ असते.
इंग्लिश भूमीत धावा जमवण्याचा एकच मंत्र असतो, तो म्हणजे चेंडू ‘क्लोज टू बॉडी’ खेळण्याचा. यात सातत्य राखले तरच यशाची थोडीफार खात्री. इंग्लिश फलंदाजांचे तंत्र लक्षात घेतले तर एक लक्षात येईल, ते नेहमी क्लोज टू बॉडी चेंडू असेल तरच फटके लगावतात. चेंडू आपल्यापासून बराच दूर असेल तर मात्र ते छेडछाड करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण, यात स्लीपच्या कोंदाळय़ात झेल देऊन बाद होण्याची शक्यताच अधिक.
आता, इंग्लंड-न्यूझीलंडच्या खेळपट्टय़ाही समसमान स्वरुपाच्या. त्यामुळे, न्यूझीलंडचा संघ इंग्लिश भूमीत लवकर ऍडजस्ट होतो. भारताचे मात्र तसे नाही. दुसरीकडे, या फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे, ही देखील त्यांची आणखी एक जमेची बाजू असणार आहे. आता ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे शेजारी देश आहेत. पण, या दोन्ही देशातील खेळपट्टय़ा मात्र मिळत्याजुळत्या अजिबात नाहीत. एकीकडे, न्यूझीलंडमध्ये चेंडू अधिक वळू शकतो तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियात चेंडू सीम होत नाही आणि स्विंगही होत नाही.
एरवी, भारतीय फलंदाज सीम व बाऊन्स उत्तम खेळू शकतात. त्यामुळे, ऑस्ट्रेलियात ते पराक्रम गाजवू शकतात. (हे त्यांनी मागील दौऱयात दाखवून दिले आहे). इंग्लंडमध्ये मात्र सीम व स्विंग गोलंदाजीसमोर ते चाचपडतात. न्यूझीलंडमध्ये त्यांची स्थिती अशीच दयनीय होते. मागील न्यूझीलंड दौऱयात भारताची सर्वोच्च धावसंख्या 242 होती, यावरुनही याची कल्पना येईल.
साहजिकच, या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना खऱया अर्थाने भारतीय संघासाठी रात्र वैऱयाची असेल. त्यांना जागे रहावेच लागेल! असे केले तरच न्यूझीलंडविरुद्ध इंग्लिश भूमीत त्यांना जिंकता येईल, खऱया अर्थाने किवीज चक्रव्यूह यशस्वीरित्या भेदता येईल!
शेवटच्या 5 कसोटीतील भारताचे उमदे खेळाडू
फलंदाज / धावा / सर्वोच्च / सरासरी
रोहित शर्मा / 396 / 161 / 49.5
रिषभ पंत / 382 / 101 / 63.66
विराट कोहली / 250 / 74 / 31.25
शुभमन गिल / 217 / 91 / 27.12
चेतेश्वर पुजारा / 173 / 67 / 21.62
हनुमा विहारी / 158 / 55 / 19.75
फिरकी अष्टपैलू
खेळाडू / धावा / सर्वोत्तम / बळी / सर्वोत्तम
आर. अश्विन / 238 / 106 / 34 / 6-61
रविंद्र जडेजा / 182 / 60ना. / 9 / 4-67
जलद गोलंदाज
गोलंदाज / बळी / डावात सर्वोत्तम / सरासरी
मोहम्मद सिराज / 16 / 5-73 / 28.25
जसप्रित बुमराह / 15 / 4-56 / 30.13
इशांत शर्मा / 11 / 5-68 / 21.45
सहाव्या स्थानी पंत न्यूझीलंडचा कर्दनकाळ ठरणार?
एरवी पाच फलंदाज बाद झाले की, भारताची फलंदाजी संपली, असे मानले जाते. पण, आता प्रवाहाखालून बरेच पाणी गेले असताना काही समीकरणे देखील आमुलाग्र बदलली आहेत. आता सहाव्या स्थानी रिषभ पंतसारखा तडफदार फलंदाज क्रीझवर येतो. त्यामुळे, या फायनलमध्ये न्यूझीलंडने 5 फलंदाज बाद म्हणजे भारताची फलंदाजी संपली, असा समज करुन घेतला तर ती त्यांची मोठी चूक ठरु शकते. रिषभ पंत किवीज बेसावधतेवर जोरदार हल्ला चढवू शकतो. रिषभला कसा सूर सापडणार, यावर या लढतीची अर्थातच बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.
2019 विश्वचषक उपांत्य लढतीतील पराभव ही भारताची भळभळती जखम!
इंग्लंडमध्येच 2019 मध्ये संपन्न झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते आणि आपल्याला स्पर्धेबाहेर फेकणारा संघ होता तो हाच न्यूझीलंडचा! त्या विश्वचषकात किवीज संघाविरुद्ध पत्करलेल्या पराभवाची ती जखम अजूनही भळभळती आहे. त्याचाही हिशेब भारताने येथे चुकता करायलाच हवा!