ऑनलाईन टीम / देहरादून :
मागील काही दिवसांपासून पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, आता तणाव कमी झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली.
देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये आज पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते बोलत होते. नरवणे म्हणाले, चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दोन्ही देश चर्चेतून या वादावर मार्ग काढत आहेत. जी कॉर्पस कमांडर पातळीवरील चर्चेने हा वाद सोडवण्यास सुरूवात झाली आहे. यापुढेही चर्चा करून दोन्ही देश मतभेदावर सक्षमपणे मार्ग काढतील.
नेपाळशी सुरू असलेल्या वादावर बोलताना नरवणे म्हणाले, नेपाळ बरोबर भारताचे चांगले नाते आहे. नेपाळसोबत भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. नेपाळ आणि भारतातील लोकांचेही एकमेकांशी दृढ नाते आहे. हे नाते भविष्यातही नेहमीच दृढ राहील, असे नरवणे यांनी सांगितले.