प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाद संपविण्याचा मुद्दा – भारताची सूचना मानण्यास चीनचा नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात सैन्य कमांडर स्तरावर रविवारी झालेल्या 13 व्या फेरीतील चर्चेत काहीच ठोस निष्पन्न होऊ शकलेले नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेले भाग आणि अन्य वादग्रस्त हिस्स्यांवरून अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या, चिनी सैन्याने यावर सहमती दर्शविली नसल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले आहे.
बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील चर्चा प्रामुख्याने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाद संपविण्यावर केंद्रीत राहिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्दय़ांमध्ये दौलत बेग ओल्डी आणि डेमचोक भागांमधील वाद देखील सामील आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाची स्थिती चीनमुळे निर्माण झाली आहे. चीन सातत्याने जैसे थे स्थिती बदलण्याचा आणि द्विपक्षीय करारांच्या उल्लंघनाचा एकतर्फी प्रयत्न करत राहतो. अशा स्थितीत चीनने या भागांमध्ये योग्य पावले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसोबत उर्वरित भागांमध्ये शांतता प्रस्थापित करता येईल अशी भूमिका भारताकडून चर्चेदरम्यान मांडण्यात आली.
चर्चा सुरू ठेवण्यावर सहमती
दोन्ही देश संपर्क कायम ठेवणे आणि क्षेत्रात स्थैर्य राखण्यावर सहमत झाले आहेत. चीन द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंना विचारात घेत द्विपक्षीय करार आणि शिष्टाचारांचे पूर्णपणे पालन करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अशाप्रकारेच वादग्रस्त मुद्दय़ांवर लवकर तोडगा काढण्याच्या दिशेने काम होऊ शकते असे भारतीय सैन्याने स्पष्ट केले आहे.
सहमती अंतर्गत तोडगा निघावा
दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांच्या दुशांबे येथील बैठकीचा उल्लेख करत भारताने बैठकीच्या परिणामांनुरुपच तोडगा असायला हवा असे म्हटले आहे. या बैठकीत दोन्ही देश वादग्रस्त मुद्दय़ांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यावर सहमत झाले होते. भारताच्या अनुचित आणि अवास्तव मागण्यांमुळे वाद संपविण्याऐवजी चर्चेतील अडचणी वाढल्याचा कांगावा चिनी सैन्याने केला आहे. भारताने स्थितीचे चुकीचे आकलन करू नये असेही चीनने म्हटले आहे.
हॉट स्प्रिंग्समध्ये आमने-सामने
पँगोंग सरोवर आणि गोगरा पोस्टच्या उत्तर आणि दक्षिण काठावर सैनिक मागे हटले आहेत. पण हॉट स्प्रिंग्सवर ठाण मांडून आहेत. मे 2020 पासूनच दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. भारतीय सैनिकांना चिनी देपसांग मैदानाच्या पारंपरिक गस्त पॉइंट्सवर जाण्यापासून रोखले जात आहे. हा भाग काराकोरम खिंडीनजीक दौलत बेग ओल्डी येथील भारतीय चौक्यांपासून फार अंतरावर नाही.