45 वर्षांनी घडली गोळीबाराची घटना, दोन्ही देशांदरम्यानच्या तणावात वाढ,
चीनचा कांगावा भारतीय सैन्याने फेटाळला, ‘पीएलए’वर आक्रमक कृतीचा ठपका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली – लडाख
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून पँगोंग त्से सरोवरावरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) गोळीबार होण्याची घटना सोमवारी उशिरा घडल्याचे उघड झाले आहे. चीनने भारतीय सैनिकांवर पांगोंग त्सेच्या दक्षिणेकडील भागामध्ये गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. तथापि, चीनच्या बाजूने प्रथम हवेत गोळीबार करण्यात आला, पण चिथावून टाकू पाहणाऱया या कृत्याला बळी न पडता चिनी सैन्याचा डाव हाणून पाडण्यात आला, असे भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 1975 नंतर 45 वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात गोळीबाराची घटना घडली आहे.
लडाखमधील पांगोंग त्से येथे भारतीय सैन्याने इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केल्यानंतर परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी उत्तर देणाऱया उपाययोजना कराव्या लागल्या, असा दावा पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) दावा केला. त्यानंतर काही तासांनी लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी, भारतीय सैन्याने कोणत्याही टप्प्यावर ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’चे उल्लंघन केलेले नाही किंवा गोळीबार करण्यासह कोणत्याही आक्रमक मार्गाचा वापर करण्याचे प्रयत्न केलेले नाहीत, असे स्पष्ट केले.
भारतीय सैन्याने ‘एलएसी’ ओलांडल्याचा दावा
भारतीय सैनिकांनी चिनी इरादे हाणून पाडताना पाँगोंग त्से आणि रेचिन लाच्या दक्षिण काठावरील उंचावरील मोक्मयाच्या ठिकाणांवर कब्जा केल्यानंतर ‘पीएलए’चे वरील आरोप करणारे विधान सोमवारी रात्री उशिरा आले. ‘पीएलए’च्या पश्चिमी थिएटर कमांडचे प्रवक्ते कर्नल झांग शुयली यांनी भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीन-भारतीय सीमेवरील पश्चिम विभागातील बांगोंग हुनान येथे प्रवेश केल्याचा दावा केला आहे. यादरम्यान भारतीय सैन्याने गोळीबार करून चिनी सीमा संरक्षण दलांच्या गस्त घालत असलेल्या जवानांना धमकावले आणि त्यांना प्रत्युत्तरार्थ कारवाई करण्यास भाग पाडले गेले, असा ठपका त्यांनी ठेवला आहे.
चिनी सैन्याने हवेत फैऱया झाडल्या
मात्र ‘पीएलए’चे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूने आमच्या एका ठिकाणाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जेव्हा त्यांचा डाव हाणून पाडण्यात आला तेव्हा त्यांनी भारतीय सैन्याला धमकावण्याच्या प्रयत्नात हवेत काही फैऱया झाडल्या. चिथावून टाकण्याचा गंभीर प्रयत्न करूनही भारतीय सैन्याने मोठा संयम पाळला आणि परिपक्व व जबाबदार वर्तन केले, असे भारतीय लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
‘पीएलए’कडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
लष्करी, राजनैतिक आणि राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू असताना ‘पीएलए’ने स्पष्टपणे करारांचे उल्लंघन करत आक्रमक डावपेच चालविले आहेत, असाही प्रत्यारोप भारतीय लष्कराने केला आहे. भारतीय सैन्य शांतता राखण्यास कटिबद्ध आहे, तथापि राष्ट्रीय अखंडता आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यास देखील कटिबद्ध आहे. चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे वक्तव्य म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असेही भारतीय लष्कराने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय सैनिकांना त्यांनी व्यापलेल्या उंचावरील मोक्याच्या ठिकाणांपासून हटविण्यासाठी अनेकदा चिनी सैन्याकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. सोमवारी चिनी आणि भारतीय सैनिक टेकडय़ांमध्ये गोळीबाराच्या टप्प्यात येतील इतके जवळ होते तेव्हा सुमारे 50 चिनी सैनिक मुखपरीजवळच्या एका भारतीय सैन्याच्या ठिकाणाजवळ आले. यावेळी भारतीय सैन्याने त्यांना ओरडून बजावले आणि शस्त्रे दाखविली. त्यानंतर चिनी सैनिकांनी धमकावण्याच्या प्रयत्नात फैऱया झाडल्या, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
यापूर्वी 15 जून रोजी गल्वान खोऱयामध्ये दोन्ही सैन्यांदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षातही दोन्ही बाजूंनी बंदुकांचा वापर करण्यात आला नव्हता. यात 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते आणि अनेक चिनी सैनिक ठार झाले होते.
चिनी प्रसिद्धीमाध्यमातील वृत्त फेटाळले
भारतीय सैन्याने पांगोंग त्सेजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बेकायदेशीरपणे पार केली अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांना दिल्याचे जे वृत्त चीनच्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे त्याचे भारताने मंगळवारी खंडन केले असून सदर वृत्त वस्तुस्थितीवर आधारून नसून पूर्णपणे खोटारडे असल्याचे स्पष्ट केले.
अरुणाचलमधून बेपत्ता नागरिक चीनच्या ताब्यात
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता असलेले पाच जण आपल्या बाजूने सापडले आहेत याची पुष्टी चीनने केली असून त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. चीनच्या ‘पीएलए’ने भारतीय सैन्याने पाठविलेल्या हॉटलाईन संदेशाला प्रत्युत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता तरुण आपल्या बाजूने सापडल्याची पुष्टी त्यांनी केली आहे. त्या व्यक्तींना आमच्या ताब्यात देण्यासाठी सोपस्कार केले जात आहेत, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.