ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमावादामुळे भारत-चीन सैन्यांतील तणाव कायम आहे. या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आज भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावरील चर्चेची 14 वी फेरी सुरू झाली आहे.
वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, या चर्चेमध्ये पूर्व लडाखमधील वादग्रस्त सीमा भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर चर्चा होईल. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह येथील 14 कॉर्प्सचे नवनियुक्त कमांडर लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी केले आहे. चीनच्या संघाचे नेतृत्व दक्षिण झिंजियांग लष्करी जिह्याचे प्रमुख मेजर जनरल यांग लिन यांनी केले आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चिनी भागातील चुशूल-मोल्दोव्हा येथे ही कोअर कमांडर स्तरावरील चर्चा होत आहे.
या चर्चेमध्ये भारताने डेप्संग बेग आणि डेमचोक येथील मुद्यांचे निराकरण करण्यासह उर्वरित सर्व वादग्रस्त सीमाभागातून सैन्य मागे घेण्यासाठी जोर देणे अपेक्षित आहे. दोन्ही देशांमधील लष्करी चर्चेची 13 वी फेरी 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. या चर्चेत या मुद्यांवर तोडगा निघाला नव्हता.