ऑनलाईन टीम / बीजिंग :
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीत चीनचे 5 सैनिक मारले गेले आहेत, तर 11 सैनिक जखमी झाल्याचे वृत्त चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिले आहे.
मागील काही दिवसांपासून चीनी सैन्यांकडून भारतीय हद्दीत अतिक्रमण सुरू होते. त्यामुळे पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर दोन्ही देशात तणाव वाढला होता. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. तर चीनच्या ग्लोबल टाइम्सचे पत्रकार वांग वेनवेन यांनी म्हटले आहे की, LAC वर चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीचे ५ सैनिक मारले गेले असून ११ सैनिक जखमी झाले आहेत.
दोन्ही देशातील तणाव वाढू नये म्हणून, दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून आपापसात चर्चा सुरू आहे. या हल्ल्याविषयी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आले, तेव्हा भारतानेच आगपाखड करत सीमारेषा ओलांडली आणि चिनी सैन्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. चीनने केलेला हा दावा भारताने फेटाळून लावला आहे.