वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावावर अद्यापही ठोस तोडगा न निघाल्याने भारताने चीनच्या सीमेवर आणखी 35 हजार जवान पाठविण्याची तयारी चालवली आहे. या सैनिकांना चीनला लागून असलेल्या वादग्रस्त सीमाभागांमध्ये तैनात केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकीकडे लष्कराकडून अतिरिक्त फौजफाटा तैनात केला जात असतानाच नौदलाकडूनही सुसज्जता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे. लष्कर, हवाई दल व नौदल या तिन्ही आघाडय़ांवर सरकारने चीनविरोधात आघाडी उघडली असून त्याच्या जोडीला राजनैतिक व आर्थिक मार्गाचा वापरही केला जात आहे.
लष्करी पातळीवरील चर्चेनंतर सध्या दोन्ही बाजूंमध्ये चालणाऱया चकमकी थांबल्या आहेत. दोन्ही देशांच्या वरि÷ सैन्य अधिकाऱयांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या आहेत. बहुतांश भागांमधील सैन्य मागे हटवल्याचा दावा चीनकडून केला जात आहे. मात्र, पूर्ण खातरजमा झाल्यानंतरच भारताकडून अतिरिक्त फौजफाटा कमी केला जाणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱयाने स्पष्ट केले.
आता दोन्ही बाजूंकडून पाचव्या फेरीच्या चर्चेची तयारी केली जात आहे. काही बाबींमध्ये चीन अजूनही आडमुठेपणा दाखवत असल्यामुळे अंतिम तोडग्याला यश येत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळेच भारताने सीमेवरील सैन्यबळ वाढवून चीनवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, सर्वोच्च राजकीय स्तरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत दोन्ही बाजू माघार घेणार नसल्याचेच सद्यस्थितीत दिसून येत आहे.
भारताची 3 हजार 488 किलोमीटरची सीमारेषा चीनला लागून आहे. जूनमध्ये सीमारेषेवर गलवान खोऱयात झालेल्या संघर्षात 20 भारतीय सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक, रणगाडे, तोफा, लढाऊ विमाने तैनात केली होती. मात्र, त्यानंतर लष्करी पातळीवर झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळी काही तणावाच्या मुद्यांवर एकमत झाल्याने चीनचे सैन्य माघारी फिरले होते. मात्र, आणखी काही तळांवर अजूनही चिनी सैनिक तैनात असल्यामुळे भारतानेही आक्रमक पवित्रा घेत सैन्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.