वृत्तसंस्था/ ढाक्का
भारत आणि जपान यांच्यात येथे मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेतील चुरशीची उपांत्य लढत होणार आहे. मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते. तसेच या स्पर्धेतील भारत माजी विजेता आहे. जपानच्या संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले असून मंगळवारची लढत दर्जेदार आणि अटीतटीची राहील.
आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत राऊंडरॉबिन गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने जपानचा 6-0 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केल्याने मंगळवारी होणाऱया उपांत्य सामन्यात भारताच्या तुलनेत जपान संघावर अधिक दडपण राहील. भारतीय संघ या उपांत्य सामन्यात पुन्हा मोठय़ा फरकाने जपानचा पराभव करत अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. पाच देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत राऊंडरॉबिन टप्याअखेर भारताने 10 गुणांसह पहिले, कोरियाने 6 गुणांसह दुसरे, जपानने 5 गुणांसह तिसरे, पाकने 5 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. मात्र यजमान बांगलादेशला शेवटपर्यंत गुणतक्त्यात आपले खाते उघडता आले नाही. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाची ही पहिलीच महत्त्वाची स्पर्धा आहे. राऊंडरॉबिन गटातील पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारताला 2-2 असा बरोबरीत रोखले होते. त्यानंतर दुसऱया सामन्यात भारताने यजमान बांगलादेशचा 9-0, पाकचा 3-1 आणि जपानचा 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. भारतीय संघाचा उपकर्णधार हरमनप्रित सिंग याची या स्पर्धेतील आतापर्यंत कामगिरी दर्जेदार झाली आहे. मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, दिलप्रित सिंग, जरमन प्रित सिंग, आकाशदीप सिंग आणि समशेर सिंग यांच्या कामगिरीवरच भारतीय संघाचे यश अवलंबून राहील. मस्कतमध्ये यापूर्वी झालेल्या आशिया चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत भारत आणि पाक यांनी संयुक्त विजेतेपद पटकाविले होते. आता भारतीय हॉकी संघ सलग दुसऱयांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी या स्पर्धेत दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱया उपांत्य सामना खेळविला जाणार आहे.