वृत्तसंस्था /पर्ल
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे शुक्रवारी यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दुसरा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यातील खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता प्रारंभ होईल. कर्णधार के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मालिकेतील आव्हान राखण्यासाठी दर्जेदार कामगिरी करावी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयात राहुलला कसोटी सामन्यातही फलंदाजीची संधी मिळाली होती. कसोटी मालिका गमविल्यानंतर भारताने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात बुधवारी हार पत्करली. दक्षिण आफ्रिकेने भारताचा या सामन्यात 31 धावांनी पराभव करत मालिकेत आघाडी मिळविली आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून बाजूला झालेल्या विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकविले. सलामीचा फलंदाज शिखर धवनने आक्रमक फलंदाजी केली पण कर्णधार राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर तसेच नवोदित वेंकटेश अय्यर यांना फलंदाजीत अधिक धावा जमविता आल्या नाहीत. शार्दुल ठाकुरने एकाकी लढत देत अर्धशतक झळकविले.
भारतीय संघाला या मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीतही सुधारणा करावी लागेल. शुक्रवारच्या दुसऱया सामन्यात भारतीय संघामध्ये काही बदल शक्य असल्याची चर्चा चालू आहे. सिराज दुखापतीतून पूर्ण बरा झाला असून त्याला दुसऱया सामन्यात कदाचीत संधी मिळू शकेल.