वृत्तसंस्था/ / मस्कत (ओमान)
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत सोमवारी अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने सिंगापूरचा 9-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आता भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
सोमवारच्या सामन्यातील विजयामुळे भारतीय महिला संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली तसेच 2022 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या स्पेन आणि हॉलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱया महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील आपले स्थानही निश्चित केले आहे. सोमवारी झालेल्या अ गटातील शेवटच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी सिंगापूरवर गोलांचा भडीमार केला. भारतीय संघातील गुरजित कौरने शानदार हॅट्ट्रीक नोंदवताना आठव्या, 37 व्या आणि 48 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदविले. मोनिकाने सहाव्या आणि 17 व्या मिनिटाला त्याचप्रमाणे ज्योतीने 43 आणि 58 व्या मिनिटाला असे प्रत्येकी दोन गोल केले. वंदना कटारियाने आठव्या मिनिटाला तर मारिना कुजूरने 10 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. सिंगापूरतर्फे एकमेव गोल ली मिन तोहने 43 व्या मिनिटाला नोंदविला.
सामन्यातील पहिल्या 15 मिनिटाच्या कालावधीत भारतीय खेळाडूंनी आक्रमक चाली करत सिंगापूरच्या बचावफळीवर दडपण आणले. मोनिकाने सहाव्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर गुरजीत कौर आणि वंदना कटारिया यांनी प्रत्येकी एक गोल नेंदवून भारताची आघाडी 3-0 अशी वाढविली. गुरजीत कौरने हा गोल पेनल्टी कार्नरवर नोंदविला. भारताच्या मारियाना कुजूरने 10 व्या मिनिटाला आपल्या संघाचा चौथा गोल केला. दरम्यान भारताने दुसरा पेनल्टी कॉर्नर वाया घालविला. गुरजीत कौरला संघाला मिळालेल्या तिसऱया पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेता आला नाही. मोनिकाने 17 व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल केला. सिंगापूरच्या गोलरक्षकाने भारताचे आणखी दोन पेनल्टी कॉर्नर थोपविले. सामन्याच्या उत्तरार्धात पहिल्या चार मिनिटामध्ये भारताने आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले पण त्यावर गोल नोंदविता आला नाही. 37 व्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा सहावा गोल केला तर 43 व्या मिनिटाला सिंगापूरने पेनल्टी कॉर्नरवर एकमेव गोल केला. ज्योतीने भारताचा सातवा गोल नोंदविला. गुरजीत कौरने 48 व्या मिनिटाला भारताचा आठवा तर वैयक्तिक तिसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. ज्योतीने 58 व्या मिनिटाला भारताचा नववा गोल करून सिंगापूरचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.