वृत्तसंस्था/ लखनौ
यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला शनिवारी येथे सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होत आहे. यजमान भारताला वनडे मालिका यापूर्वी गमवावी लागली असल्याने हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ टी-20 मालिकेत विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील यापूर्वी झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक न झाल्याने त्यांना ही मालिका 1-4 अशा फरकाने गमवावी लागली होती. या मालिकेतील दुसऱया सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडय़ांनी पराभव केला होता. पण उर्वरित चार सामने भारताला निकृष्ट फलंदाजी तसेच गोलंदाजी मुळे गमवावे लागले होते. या मालिकेतील तिसऱया आणि चौथ्या सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी बऱयापैकी फलंदाजी करत कडवे आव्हान दिले होते. पण दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सर्वच विभागात भारतापेक्षा अधिक सरस ठरल्याने यजमान संघाला वनडे मालिका गमवावी लागली होती. वनडे मालिकेतील पराभव विसरून आता नव्या दमाने टी-20 मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला पुन्हा आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व मिताली राजकडे होते. पण टी-20 प्रकारात आता हरमनप्रित कौर भारतीय संघाचे नेतृत्व करीत असून स्मृती मानधना उपकर्णधार आहे. पूनम यादव आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहील. सलामीच्या जेमिमा रॉड्रिग्जला फलंदाजीचा सूर अद्याप मिळालेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ वनडे मालिकेप्रमाणेच या टी-20 मालिकेतही भारतावर आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिका संघातील सलामीची फलंदाज लिझेली ली तसेच डू प्रीझ आणि वुल्व्हर्ट यांची फलंदाजी बहरत असल्याचे दिसून येते. शबनीम इस्माईल आणि सेकुखुने या दक्षिण आफ्रिका संघातील आतापर्यंत यशस्वी गोलंदाज ठरल्या आहेत. शनिवारच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ किमान 160 धावा जमविण्यासाठी प्रयत्न करेल