शेवटच्या साखळी सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करण्याची आवश्यकता
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेत आज (रविवार दि. 27) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघासमोर कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करण्याचे आव्हान असेल. हा सामना जिंकला तरच भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. भारताने आतापर्यंत 6 सामन्यात 3 विजय व 3 पराभव अशी संमिश्र कामगिरी नोंदवली असून, आजची लढत संघासाठी करा वा मरा धर्तीवरील असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 6.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
भारतीय संघ गुणतालिकेत 6 गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान असून साखळी फेरीअखेर पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. वास्तविक, भारतीय संघ गुणतालिकेत सातत्याने तिसऱया स्थानी कायम होता. मात्र, दक्षिण आफ्रिका व विंडीज यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली आणि विंडीजचा संघ अनायासे एक गुण मिळाल्याने भारताला पिछाडीवर टाकण्यात यशस्वी ठरला. आज भारत-दक्षिण आफ्रिका लढत काही कारणामुळे रद्द झाली तर भारताला एक गुण प्राप्त होईल व सरस धावसरासरीमुळे संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होऊ शकेल. पण, सामना पूर्ण होऊ शकत असेल तर अशा परिस्थितीत भारताकडे विजय प्राप्त करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय असणार नाही.
सध्या भारताची धावसरासरी (0.768) विंडीजच्या सरासरीपेक्षा (-0.890) सरस आहे. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात एकवेळ पराभव पत्करावा लागला तर अशा परिस्थितीत इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध शेवटच्या लढतीत पराभूत होण्याची अपेक्षा करावी लागेल. पण, ती शक्यता किमान कागदावर तरी कमीच असेल.
भारताने यापूर्वी मागील लढतीत बांगलादेशविरुद्ध 110 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला होता आणि तोच विजयी धडाका येथे कायम राखत सलग दोन विजयांसह उपांत्य फेरीत धडक मारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असेल. मात्र, दक्षिण आफ्रिकन संघ भारतापेक्षा अधिक बहरात राहिला असून यामुळे तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्व गाजवले तरच भारताला यशाची अपेक्षा करता येणार आहे.
मितालीला सूर सापडणे महत्त्वाचे
भारतीय कर्णधार मिताली राज बॅड पॅचमधून जात असून तिला सूर सापडणे भारतासाठी विशेष महत्त्वाचे असणार आहे. या स्पर्धेत ती चारवेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाली आहे. भारताला उपांत्य फेरी गाठता आली नाही तर 39 वर्षीय मितालीसाठी हा शेवटचा सामना ठरु शकतो. त्या पार्श्वभूमीवर देखील ती बहरात परतण्यासाठी प्रयत्नशील असेल.
विंडीजविरुद्ध झळकावलेल्या शतकाचा अपवाद वगळला तर स्मृती मानधनाने देखील अपेक्षापूर्ती केलेली नाही. शफालीला बांगलादेशविरुद्ध सूर सापडला तर यास्तिया भाटिया तिसऱया स्थानी उत्तमरित्या स्थिरावली आहे. उपकर्णधार हरमनप्रीत कौर हीच सध्या भारतीय संघातर्फे सातत्यपूर्ण योगदान देत आली असून अष्टपैलू पूजा वस्त्रकार व स्नेह राणा यांनी तळाच्या स्थानी आपली उपयुक्तता अधोरेखित केली आहे. दक्षिण आफ्रिकन संघाने यंदाच्या आवृत्तीत आतापर्यंत एकच पराभव पत्करला असून भारताला नमवणे त्यांच्यासाठी फारसे आव्हानात्मक नसेल. त्या पार्श्वभूमीवर, तिन्ही आघाडय़ांवर सरस कामगिरी साकारली तरच भारताला त्यांच्याविरुद्ध विजय मिळवता येईल, हे सुस्पष्ट आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकुर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
दक्षिण आफ्रिका ः सुने लूस (कर्णधार), ट्रियॉन (उपकर्णधार), तॅझमिन ब्रिट्स, त्रिशा चेट्टी, मिग्नॉन डय़ू प्रीझ, लारा गुडॉल, शबनीम इस्माईल, सिनाला जाफ्ता, मेरिझेन कॅप्प, अयाबोंगा खाका, मासाबाता क्लास, लिझेले ली, नोंवुलुकेको, सेखुखेने, लॉरा वुलडार्ट.
सामन्याची वेळ ः सकाळी 6.30 वा.