वृत्तसंस्था/ काठमांडू
पुढील आठवडय़ात मालदिवमध्ये होणाऱया सॅफ चॅम्पियनशिपची तयारी भारतीय फुटबॉल संघ नेपाळविरुद्धच्या दोन मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्याने करणार आहे. यातील पहिला सामना गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी येथे होणार आहे.
पाच संघांचा सहभाग असलेली सॅफ चॅम्पियनशिप 3 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत मालेतील नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारताशिवाय बांगलादेश, लंका, यजमान मालदिव, नेपाळ या अन्य संघांचा त्यात सहभाग आहे. ‘आम्ही पुन्हा येथे एकत्र आलो आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. पुढील महिन्यात होणाऱया सॅफ चॅम्पियनशिपच्या तयारीच्या दृष्टीने नेपाळविरुद्धचे दोन सामने आम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. सरावापेक्षा प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याचा अनुभव खूप मोलाचा असतो, याची आम्हाला जाणीव आहे,’ असे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले. नेपाळविरुद्धचा दुसरा मित्रत्वाचा सामना 5 सप्टेंबर रोजी खेळविला जाणार आहे. दोन्ही सामने येथील दशरथ स्टेडियमवर होणार आहेत.
2018 विश्वचषक स्पर्धा आणि 2023 आशियाई चषक पात्रतेचा शेवटचा साखळी सामना अफगाणविरुद्ध 15 जून रोजी झाला होता. त्यानंतर प्रथमच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेत आहे. मात्र येथे ढगाळ हवामान असल्याने गुरुवारच्या सामन्यावेळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या येथे जोरदार पाऊस सुरू असल्याने खेळण्यासाठी वातावरण आधीच कठीण बनले आहे. सामन्यावेळी पाऊस येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. तसे झाल्यास एक रोमांचक सामना होऊ शकेल, असे स्टिमॅक पुढे म्हणाले.
‘प्रतिस्पर्धी संघ म्हणून आणि फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीत नेपाळने जी प्रगती केलीय, त्याचा आम्ही चांगला अभ्यास केला आहे. दर्जेदार फुटबॉल खेळण्याची त्यांच्यात क्षमता असून कोणत्याही संघाविरुद्ध ते भक्कम बचाव करू शकतात. माझ्या सहकाऱयांनी चांगले काम केले असून संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा आहे,’ असे भारतीय कर्णधार सुनील चेत्री म्हणाला. सध्या कठीण काळ असतानाही येथे सामने खेळण्याची संधी दिल्याबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल त्याने नेपाळ सरकार व एएनएफए यांचे आभार मानले आहेत.
खेळाडूंची मानसिकता बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे नेपाळचे प्रशिक्षक अब्दुल्ला अलमुतैरी म्हणाले. ‘जनतेला खुश करणे एवढेच आमचे उद्दिष्ट नसून त्यांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही यासाठी तयारी केली असून सॅफ स्पर्धा जिंकणे आणि 2023 एएफसी चषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविणे हे आमचे मुख्य टार्गेट आहे. आम्हाला फिफा मानांकनाची अजिबात काळजी नाही. त्यामुळे भारताला या लढती सोप्या जाणार नाहीत, एवढे मी निश्चितपणे म्हणू शकतो,’ असेही ते म्हणाले.