वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि नेपाळ यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची शुक्रवारी येथे बैठक झाली आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत करून भविष्यकाळात ते अधिकाधिक दृढ बनविले जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संपर्क, व्यापार आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत.
नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रदीपकुमार ग्यावाली यांनी शुक्रवारी भारताचे विदेश मंत्री जयशंकर यांच्याशी दोन तास चर्चा केली. ग्यावाली यांच्यासह नेपाळचे विदेश सचिव भरतराज पौडय़ाल भारतात गुरूवारीच आले आहेत. सध्या नेपाळला राजकीय अस्थिरतेने घेरले आहे. पंतप्रधान ओली यांनी संसद स्थगित केली असून नव्याने निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला असून आता भारताची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तो देश प्रयत्न करीत आहे. भारताचा काही भूभाग नेपाळने त्याच्या नकाशात दाखविल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून भारताने नेपाळचा दावा फेटाळला आहे.
बिहारमधील मोतीहारी ते नेपाळमधील अमलेखगंज यांच्यामध्ये गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. यामुळे नेपाळची ऊर्जेची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात भागणार आहे. याशिवाय काही रस्तेबांधणी प्रकल्पही संयुक्तरित्या हाताळले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. नेपाळमधील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा आहे.