मलाल यूसुफजाईचे स्वप्न – हिंदी चित्रपट अन् क्रिकेट पाहण्याची इच्छा
वृत्तसंस्था/ जयपूर
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमांचे बंधन नसावे. धार्मिक दुही निर्माण करणारे जुनाट विचार संपुष्टात यावेत असे माझे स्वप्न असल्याचे उद्गार नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाई हिने काढले आहेत. जयपूर साहित्य महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ऑनलाईन कार्यक्रमात सामील होत ‘आय ऍम मलाला ः द स्टोरी ऑफ द गर्ल हू स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड शॉट बाय द तालिबान’ या स्वतःच्या पुस्तकासंबंधी तिने माहिती दिली आहे.
बॉलिवूडचे चित्रपट आणि क्रिकेट आम्ही पाहू इच्छितो. भारताचे लोकही पाकिस्तानी नाटक पाहणे सुरू ठेवू शकतात. दोन्ही धर्मांच्या लोकांनी शांतता तसेच समाधानाने रहावे, हेच माझे स्वप्न असल्याचे मलाला म्हणाली.
पाकिस्तानात अल्पसंख्याक असुरक्षित
अल्पसंख्याक हे पाकिस्तानच नव्हे तर कुठल्याच देशात सुरक्षित नाहीत. अल्पसंख्याकांना प्रत्येक देशात सुरक्षेची गरज आहे. हा मुद्दा धर्माशी निगडित नसून अधिकारांच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेतला जाण्याची गरज असल्याचे मलालाने म्हटले आहे.
द्वेष का निर्माण झाला?
तुम्ही भारतीय आणि मी पाकिस्तानी असून आम्ही पूर्णपणे बरे आहोत. तरीही आमच्यात हा द्वेष का निर्माण झाला? सीमा, फाळणी, फूट पाडा आणि राज्य करा हे जुने धोरण आता काम करत नाही, कारण आम्ही सर्वजण शांततेत राहू इच्छितो. भारत आणि पाकिस्तानचे खरे शत्रू गरीबी, भेदभाव आणि विषमता आहे. पररस्परांशी लढण्यापेक्षा दोन्ही देशांनी एकत्र येत याचा सामना करावा असे उद्गार तिने काढले आहेत.