यू-19 आयसीसी विश्वचषक स्पर्धा : सलग तिसऱयांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे युवा भारतीय संघाचे लक्ष्य
पोचेफस्ट्रूम / वृत्तसंस्था
चारवेळचा विजेता भारतीय संघ आज (दि. 4) आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत देईल. या स्पर्धेच्या इतिहासात सलग तिसऱयांदा अंतिम फेरीत धडक मारण्याचे यावेळी युवा भारतीय संघाचे लक्ष्य असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
भारत व पाकिस्तानचे दोन्ही संघ यंदा उपांत्य फेरीत पोहोचेतोवर अपराजित राहिले आहेत. त्यामुळे, आजची लढत विशेष रंगतदार ठरली तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही. उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला तर पाकिस्तानने अफगाणिस्तानला धूळ चारत आगेकूच केली होती. त्यानंतर दोन्ही संघ आज आमनेसामने भिडत आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार रोहित नझीरने या लढतीत दडपण नसल्याचा दावा केला. पण, भारत-पाकिस्तानचे संघ कोणत्याही स्तरावर लढत असताना दोन्ही संघांचा चांगलाच कस लागतो, हे सातत्याने दिसून आले आहे. अशा सामन्यात एखादी विजय मिळवून देणारी खेळी त्या खेळाडूला रातोरात स्टार बनवून जाते, असेही दिसून आले आहे आणि याची खेळाडूंनाही पूर्ण कल्पना आहे.
कागदावरील संघ पाहता, भारत सरस आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषकात झालेल्या शेवटच्या लढतीत भारताने पाकिस्तानला नमवले होते. तीच परंपरा येथेही कायम ठेवण्याचा भारतीय युवा संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघ या स्पर्धेत विद्यमान विजेता असून 2018 मधील आवृत्तीत त्यांनी पाकिस्तान युवा संघाचा तब्बल 203 धावांनी धुव्वा उडवला होता. अर्थात, क्रिकेटच्या रणांगणात इतिहास कामी येत नसतो आणि नेहमी वर्तमानात उत्तम खेळणारा संघच सरस ठरतो, हे पाहता, भारताला नव्याने सुरुवात करावी लागेल. साहजिकच, प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला येथे पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी लागेल.
सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा भारतीय युवा संघाच्या फलंदाजी लाईनअपचा भक्कम आधारस्तंभ ठरत आला असून या आवृत्तीत त्याने आतापर्यंत 4 लढतीत 3 अर्धशतके झळकावली आहेत. अन्य फलंदाजांनी मात्र त्या तुलनेत फारसे लक्षवेधी योगदान दिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. अपवाद फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीचा ठरेल. त्या लढतीत भारताच्या तळाच्या फलंदाजी लाईनअपने दमदार फलंदाजी साकारली नसती तर निकाल वेगळा असता. याशिवाय, जलद गोलंदाज कार्तिक त्यागीचा भेदक स्पेल देखील त्यावेळी तितकाच महत्त्वाचा ठरला होता.
अथर्व अंकोलेकर व बहरातील लेगस्पिनर रवी बिश्नोई यांनी सातव्या गडय़ासाठी 61 धावांची संघर्षमय भागीदारी साकारली व या बळावर भारताला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली होती. नंतर भारताने तो सामना सहज जिंकला होता.
आजच्या लढतीत अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर खान व ताहीर हुसेन या पाकिस्तानी जलद गोलंदाजांचा मुकाबला करणे भारतासाठी आव्हानात्मक असेल. सलामीवीर हुराईराने मागील सामन्यात लक्षवेधी पदार्पण नोंदवले. अफगाणिस्तानविरुद्ध त्या सामन्यात त्याने 64 धावांचे योगदान दिले व त्याचमुळे अफगाणिस्तान संघाला सहज विजय संपादन करता आला. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघात बरीच जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 1.30 पासून.
कोटस
या सामन्यावर सर्व क्रिकेट जगताचे लक्ष आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण, तरीही आम्ही एखाद्या नेहमीच्या लढतीप्रमाणे या लढतीत खेळू आणि वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करु.
-पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद हुराईरा