सिंधू जल करार – परमनंट इंडस कमिशन करणार नदीशी संबंधित मुद्दय़ांवर चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू नदीसह अन्य प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारपासून दोन दिवसीय बैठक होणार आहे. स्थायी सिंधू आयोगाच्या (परमनंट इंडस कमिशन) बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चेसाठी 8 सदस्यीय पाकिस्तानी शिष्टमंडळ सोमवारी भारतात पोहोचले आहे. ही बैठक नवी दिल्लीत 23 आणि 24 मार्च रोजी होणार आहे. यात जम्मू-काश्मीरमध्ये पकल दुल आणि लोअर हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या आराखडय़ावरील पाकिस्तानचे आक्षेप, नद्यांवरील नवे प्रकल्प आणि पूरसंबंधी आकडेवारीवर चर्चा होऊ शकते.
पाकिस्तानकडून सिंधू जल आयुक्त सईद मुहम्मद मेहर अली शाह हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. तर भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष व सिंधू आयुक्त पी. के. सक्सेना यांच्याकडे असणार आहे. सक्सेनासोबत केंद्रीय जल आयोग, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे सल्लागार सामील होतील.
कलम 370 हद्दपारीनंतरची पहिली बैठक
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्यात आल्यावर पहिल्यांदाच ही बैठक होणार आहे. कलम 370 हटविण्यात आल्यावर भारताने लडाखमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याची तयारी चालविली आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान आणि सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी अलिकडेच चर्चेच्या माध्यमातून वादांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले असल्याने ही बैठक महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
ऑगस्ट 2018 मध्ये अखेरची बैठक
भारत-पाकिस्तानच्या परमनंट इंडस कमिशनची अखेरची बैठक ऑगस्ट 2018 मध्ये लाहोर येथे झाली होती. ज्यात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व इंडस वॉटरचे भारतीय आयुक्त पी. के. सक्सेना यांनी केले होते.