श्रीनगर / वृत्तसंस्था
पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकदरम्यान मिठाई वाटण्याची बंद झालेली परंपरा यंदा पुन्हा सुरू करण्यात आली. दिवाळीच्या निमित्ताने गुरुवारी भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये एकोप्याचे दर्शन घडले. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवर भारतीय सुरक्षा दलांनी तीन वर्षांच्या कालावधीनंतर पाकिस्तानी सैनिकांना दिवाळीनिमित्त मिठाई दिली. दिवाळीत फक्त दिवेच उजळतात असे नाही तर एकत्र गोड खाल्ल्याने मनातील अंतरही मिटते, असा संदेशच या माध्यमातून देण्यात आला.
भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये एकमेकांच्या सणावर मिठाई वाटण्याची परंपरा स्वातंत्र्यापासून कायम आहे. मात्र, या परंपरेलाही दोन्ही देशांमधील तणावाचा फटका बसला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर दिवाळीला मिठाई वाटण्याची परंपराही थांबली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत दोन्ही देशांनी आपापसात मिठाई वाटली नव्हती. राजस्थानमधील बारमेर जिल्हय़ातील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली. तसेच दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. पाकिस्तानी सैनिकांनीही बीएसएफ जवानांना त्यांची प्रसिद्ध मिठाई दिली. पंजाबमधील अमृतसर येथील प्रसिद्ध अटारी-वाघा सीमेवर बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी रेंजर्सच्या जवानांना दिवाळीनिमित्त मिठाई दिली. तसेच जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्हय़ातील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांचे तोंड गोड केले. यावेळी दोन्ही बाजूंच्या जवानांनी एकमेकांना आलिंगन देत अभिवादन केले.