ऑनलाईन टीम / नागपूर :
आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि काश्मीरप्रश्नावरुन तणाव असताना दोन्ही देशांमध्ये होणारा हा सामना देशहित आणि राष्ट्रधर्माविरुद्ध आहे. क्रिकेटचा आणि दहशतवादाचा खेळ एकाच वेळी खेळला जाऊ शकत नाही, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
रामदेव बाबा शनिवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी विमानतळावरच त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घालून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी क्रिकेटविषयी बोलताना ते म्हणाले, काश्मीरप्रश्न आणि दहशतवादावरुन भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट सामना खेळणे राष्ट्रहिताचे नाही. ते राष्ट्रधर्माविरुद्ध आहे. एकाच वेळी क्रिकेटचा आणि दहशतवादाचा खेळ खेळला जाऊ शकत नाही.
आर्यन खानविषयी बोलताना ते म्हणाले, बॉलिवुडमधील ड्रग्जचे व्यसन भारतातील तरुणांसाठी खूपच धोकादायक आहे. नशा करण्याला ग्लॅमराईज केलं जातं. ज्यांना आदर्श मानलं जायचं, ते लोक देखील या प्रकारच्या कट-कारस्थानाच फसलेले दिसतात. बॉविवूडमधील हा कचरा वेळीच साफ व्हायला हवा.