वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘भारत पे’च्या संचालक मंडळासोबत संघर्ष करत असणारे अशनीर ग्रोवर यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माधुरी जैन यांना आर्थिक अफरातफर केल्याच्या आरोपाखाली हेड ऑफ कंट्रोल पदावरुन बडतर्फ केले होते.
राजीनामा देण्यासाठी दबाब टाकला
संचालक मंडळाकडे सादर केलेल्या आपल्या राजीनाम्यामध्ये ग्रोव्हर यांनी म्हटले आहे, की जड अंतकरणाने मी राजीनामा लिहत आहे, कारण माझ्यावर कंपनीचा राजीनामा देण्याकरीता दबाव टाकण्यात आला. आज ही कंपनी फिनटेकची जगातील सर्वात मोठी नेतृत्व करणारी कंपनी म्हणून उभी राहिली आहे. यामुळे वर्ष 2022च्या सुरुवातीला काही लोकांनी फक्त माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला नसून त्यांनी कंपनीच्या प्रतिष्ठेचेही नुकसान केले असल्याचे ग्रोवर यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रोव्हर यांना दिलासा नाही
ग्रोव्हर यांना सिंगापूर इंटरनॅशनल आरब्रिट्रेशन सेंटर(एसआयएसी) यांच्याकडून याप्रकरणी कोणताही दिलासा मिळालेला नाही. या संदर्भातील चौकशी सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी ग्रोवर यांनी चौकशी थांबवण्याचे आवाहन केल्याचे समजते. ग्रोवर यांनी या कारवाईला बेकायदेशीर असल्याचेही म्हटले आहे.